मनोज जरांगे पाटील आजपासून पुन्हा एकदा महाराष्ट्र दौरा सुरू करणार आहे. 15 ते 23 नोव्हेंबर ते महाराष्ट्र दौरा करणार आहेत. आज त्यांची पहिली सभा सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील वांगी येथे होणार आहे. तब्बल 100 एकरमध्ये ही सभा होणार आहे. यासाठी जय्यत तयारी करण्यात आली असून घटनास्थळी पोलिसांचा देखील कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मात्र एकीकडे जरांगे पाटील यांच्या महाराष्ट्र दौऱ्याला सुरूवात होत असून दुसरीकडे धनगर समाज पुन्हा आंदोलनासाठी उतरला आहे.
मराठा समाजाला OBC कोट्यातून आरक्षण देण्यासाठी विरोध केला जात आहे. काही दिवसांपूर्वी छगन भुजबळ यांनी मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यास विरोध दर्शवला. त्यानंतर शंभूराज देसाई यांनीही छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला होता. ‘मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लावू नये ही आमची मुख्य मागणी असून, हा विषय सभांधून मांडला जाईल, असे ओबीसी समाजाचे नेते व अन्न आणि नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.
मराठा-ओबीसी आरक्षणावरून सरकारमधील नेते-मंत्री वाद घालताना दिसून येत आहे. त्यामुळे आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा वादात सापडण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे, मराठा समाजाला OBC कोट्यातून आरक्षण देण्यास विरोध करण्यासाठी मोर्चे काढले जाणार आहे. 17 व 26 तारखेला OBC मोर्चा सुरू होणार आहे. याबाबत आज होणाऱ्या सोलापूरमधील सभेत मनोज जरांगे पाटील कोणती भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे पाटील यांचे राज्यव्यापी दौरे सुरू झाल्याने त्याला प्रत्युत्तर म्हणून ओबीसी समाजाच्या वतीने राज्यात ठिकठिकाणी मेळाव्यांचे आयोजन करण्यात येणार आहे. पहिला मेळावा येत्या शुक्रवारी जालना जिल्ह्यातील अंबड येथे होणार आहे. त्यानंतर हिंगोली व यवतमाळमध्ये सभा होणार आहेत.
मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देणे शक्य नसल्याने ओबीसी आरक्षणात वाटेकरी करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. परंतू ओबीसी समाजाचे आरक्षण कमी करू नये म्हणूनच आम्ही मागणी करणार असल्याचे भुजबळ यांनी स्पष्ट केले होते. मात्र मराठा आणि ओबीसी नेत्यांच्या या मेळाव्यानंतर राजकीय वातावरण आणखी शक्यता आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी “सरसकट मराठा समाजाला आरक्षण द्या, मराठा समाजाचा समावेश ओबीसीमध्ये करा, त्या नंतर सरकारने हवे तेवढे आरक्षण वाढवावे,” असेही जरांगे पाटील म्हणाले होते.