सोरतापवाडी – ‘नायगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी नायगाव, पेठ, सोरतापवाडी या संस्थेची सन २०२२ ते२०२७ पंचवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली. परंतु ती बिनविरोध पार पडण्यासाठी श्री काळभैरवनाथ परिवर्तन पॅनेलच्या वतीने १२ जागांसाठी उमेदवारी अर्ज माघारी घेण्यात आले. कारण सोसायटीच्या स्थापनेपासून सर्व निवडणुका बिनविरोध पार पडल्या आहेत. संस्थेच्या कर्जाच्या थकबाकीमुळे व खत विभागाच्या तोट्यामुळे अनेक वर्षे संस्था तोट्यात आहे. त्यामुळे सभासदांना लाभांश मिळत नाही ही बाब विचारात घेता निवडणूक बिनविरोध करण्यात आल्याचे पॅनेल प्रमुख राजेंद्र चौधरी, तुळशीराम चौधरी व सरपंच गणेश चौधरी यांनी सांगितले.
बिनविरोध परंपरा कायम राहावी यासाठी ही निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रस्ताव समोरील पॅनेलकडे दिला होता परंतु त्यांनी तो नाकारला. संस्थेचा तोटा वाढू नये व त्याचा फटका सर्वसामान्य शेतकरी सभासदांना होऊ नये तसेच गावातील राजकीय वातावरण बिघडू नये आदी बाबींचा विचार करून परिवर्तन पॅनलच्या सर्व उमेदवारांनी एकमताने संपूर्ण अर्ज माघारी घेतले. संपूर्ण निवडणूक बिनविरोध करण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. सोसायटीच्या नवनिर्वाचित संचालक मंडळाने संस्थेचा कारभार स्वच्छ व पारदर्शक करावा, सभासदांना लाभांश मिळत नाही ही बाब विचारात घेता एक हाती सत्ता असल्यास सभासदांना लाभांश व इतर अत्यावश्यक सुविधा मिळाव्यात ही अपेक्षा विचारात घेता निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी आमच्या पॅनेलच्या सर्व सहकाऱ्यानी सहकार्य करत विरोधी पॅनेलच्या हाती सत्ता दिली.
- खंजीर खुपसणाऱ्याना वेळीच आवरण्याची गरज
या निवडणुकी पेठ येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे एक नेते , माजी सरपंच व माजी अध्यक्ष यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसला असुन विरोधी गटाला सहकार्य केल्याचा आरोप केला . शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार या परिसरात आले की त्यांच्या पुढे पुढे करायचे व नंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटाला विरोध करायचे काम हे त्रिकुट करत आहे. वेळेवर जर या बंडखोरांना आवरले नाही तर आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीत ते राष्ट्रवादीला धोका देतील अशी चर्चा परिसरात चालू असल्याचे तुळशीराम चौधरी यांनी सांगितले.