पुणे- महापालिकेने तब्बल 50 कोटींहून अधिक खर्च करून उभारलेल्या नळस्टॉप चौकातील उड्डाणपुलाचा आराखडा चुकला आहे. त्यामुळे उड्डाणपूल संपताना एसएनडीटी महाविद्यालयासमोर वाहतूक कोंडीची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. ती सोडवण्यासाठी महापालिकेने पुलाच्या परिसरातील वाहतुकीत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. दहा ते पंधरा दिवसांसाठी हे बदल असतील.
अडचण काय?
नळस्टॉपकडून पौड रस्त्याकडे जाणारी वाहने आणि उड्डाणपुलावरून कर्वेरस्त्याकडे जाणारी वाहने उड्डाणपूल संपल्यानंतर समोरासमोर येत आहेत. सकाळी आणि संध्याकाळी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे.
उपस्थित कोण?
महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी याबाबत आढावा बैठक घेतली. त्यावेळी माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह, महामेट्रो, महापालिकेचा वाहतूक नियोजन विभाग, वाहतूक पोलीस तसेच पीएमपीचे अधिकारी या बैठकीत उपस्थित होते. पुढील 2-3 दिवसांत प्रायोगिक तत्वावर होणाऱ्या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.
व्यापाऱ्यांची नाराजी
या कोंडीबाबत आसपासच्या व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली असून रस्ता लहान झाल्याने ग्राहकांना पार्किंगासाठी जागा मिळत नाही. त्यामुळे पालिकेने पुलाच्या खालील बाजूस पे अँड पार्किंगची सुविधा देण्याबाबतही या बैठकीत चर्चा करण्यात आली आहे. या बदलांबाबत परिसरात जागृती केली जाणार असून त्यानंतर अंमलबजावणी होणार आहे.