मुंबई – ‘स्वातंत्र्यवीर गौरव दिवस’ 28 मे या दिवशी साजरा केला जाणार आहे. 28 मे हा स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जन्मदिवस आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनातर्फे ‘स्वातंत्र्यवीर गौरव दिवस’ म्हणून साजरा केला जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. यानिमित्त सरकारकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे.
मुख्यमंत्री कार्यालयाने ट्विट करत ही माहिती दिली आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी, राष्ट्र उन्नतीसाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे मोठे योगदान असून त्यांना अभिवादन करण्यासाठी ‘स्वातंत्र्यवीर गौरव दिन’ साजरा करण्यात येणार आहे. यादिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांच्या प्रचार-प्रसारासाठी विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. देशाच्या स्वातंत्र्यासाठी, राष्ट्रउन्नतीसाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे मोठे योगदान आहे. त्यांची देशभक्ती, धैर्य, प्रगतीशील विचारांना पुढे नेण्यासाठी त्यामाध्यमातून त्यांना अभिवादन करण्यासाठी ‘स्वातंत्र्यवीर गौरव दिन’ साजरा करण्याची मागणी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली होती,”असे या ट्वीटमध्ये सांगितले आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा २८ मे हा जन्मदिवस राज्य शासनामार्फत ‘स्वातंत्र्यवीर गौरव दिन’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे,अशी घोषणा मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी केली. यादिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांच्या प्रचार-प्रसारासाठी विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 11, 2023
दरम्यान, मागील काही दिवसांपासून सावरकरांच्या मुद्द्यावरून वाद पेटला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ‘सावरकरांनी ब्रिटीशांची माफी मागितली होती आणि सेल्युलर जेलमधून सुटल्यानंतर ते पेन्शनवर होते’, असे म्हंटले होते. त्यानंतर, ‘मी कोणाला घाबरत नाही. मी गांधी आहे, सावरकर नाही’, असेही राहुल गांधी म्हणाले होते. या विधानावरून देशभरातून संतापाची लाट उसळली होती. याप्रकरणी महाराष्ट्रात शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपच्या वतीने ‘सावरकर गौरव यात्रा’ काढण्यात आली.