कराड (प्रतिनिधी) – कराड तालुक्यासह जिल्हयात करोनाचा संसर्ग वाढत आहे. येथील तांबवे व म्हारूगडेवाडी गावातील दोन रूग्ण पॉझिटिव्ह तर त्यापैकी एका रूग्णाचा शनिवारी पहाटे मृत्यू झाला. त्यामुळे कराड तालुक्यात भीतीचे वातावरण आहे. त्यात भरीत भर म्हणून करोनाच्या जोडीला आता वळीवाने साथ दिली आहे. त्यामुळे कराड तालुक्यावर दुहेरी संकटाची टांगती तलवार आहे.
एक बाजूला करोना आणि दुसऱ्या बाजूला वळीवाचा तडाखा यात कराड तालुका पुरता घायाळ झाला आहे. संपूर्ण जगाला आपल्या विळख्यात घेऊन करोनाची सुरू असलेली आगेकूच रोखण्यासाठी शासन पातळीवर सर्वोतोपरी प्रयत्न सुरू आहेत. संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे कराड-पाटण तालुक्यातील सर्व व्यवहार ठप्प आहेत.तर शेतीची कामेही खोळंबली आहेत.
पावसाळा तोंडावर असल्याने खरिपाच्या तयारीला शेतकरी लागला आहे. परंतू, करोनामुळे रानांच्या मशागतीची कामे खोळंबली आहेत. त्यातूनही शेतकरी सर्व नियमांचे पालन करून खरीपाच्या तयारीसाठी धडपडत आहे. मात्र, त्यांना शेत कामासाठी डिझेल मिळेना. अनेक पेट्रोल पंपावर शेतकऱ्यांना अत्यावश्यक सेवेतील ओळखपत्राची मागणी केली जात असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
शेतकऱ्याच्या संकटात भर टाकण्यासाठी आता वळीवाचा पाऊस करोनाच्या मदतीला धावून आला आहे. शनिवार दि.11 रोजी सायंकाळी वादळी वाऱ्यासह गारांचा मोठा पाऊस कराडसह पाटण तालुक्यातील काही भागात पाडला. या वळीवामुळे आंबा, गव्हू, फुले, फळे शेतीचे मोठे नुकसान आहे. तब्बल दीड तास पावसाने अक्षरशः चोप दिला. अनेक ठिकाणी झाडे अन्मळून पडली.
पावसाळ्यात जनावरांसाठी आवश्यक असणार उन्हाळी चारा गोळा करण्याचे काम सध्या युध्द पातळीवर सुरू आहे. यात कडबा, गवत शनिवारच्या पावसाने भिजू गेले आहे. आंब्यांच्या झाडाखाली कैऱ्यांचा खच पडला होता. गारांचा मारा ऐवढा होता की ऊसची चाळ झाली. तर केळी, पपईच्या बागा भुईसपाट झाल्या आहेत. येथील वीट भट्टी व्यवसायीकांनाही लाखो रूपयांचा मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे करोनाच्या संकटसमयी वळीवानेही तोंड वर काढल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.
वळिवाने पाटणच्या शेतकऱ्यांची दैना
वळिवाच्या पावसाने पाटणसह ग्रामीण भागात मोठे नुकसान केले आहे. अचानक आलेल्या पावसाने घरावरचे पत्रे उडून गेले तर पाटण येथे वीज वाहिन्यांवर झाड पडल्याने वीज कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे. पाटणसह तालुक्यात शुक्रवार – शनिवारी रात्री पावसाने जोरदार हजेरी लावली. गारांसह जोरदार वाऱ्या बरोबर पडणारे पावसाने मोठे थैमान घातले. शेतकऱ्यांनी जनावरांसाठी जमा करून ठेवलेल्या चाऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. मावशी येथील सकस फॅक्टरीजवळ निलगिरीचे झाड वीज वाहिनीवर पडल्याने मोठा जाळ होऊन स्पोट झाला. जोरदार वाऱ्यामुळे पाटण-मंदुरे रस्त्यावरील चार झाडे उन्मळून पडली. वादळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.