सातारा : करोनाच्या महाभयंकर संकटाचा मुकाबला करताना जिल्ह्यातील गोरगरीब, गरजू व हातावर पोट असलेल्या कुटुंबांना जीवनावश्यक मदत पोहोचवणेही अतिशय गरजेचे आहे. हे लक्षात घेऊन गोंदवले, ता. माण येथील श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज संस्थानकडून जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातील गरजू कुटुंबांना एक महिना पुरेल एवढे अन्नधान्य व शिधा पोहोचवण्यात येत आहे. संस्थानकडून 45000 किलो धान्याचे वितरण करण्यात येत आहे.
लॉकडाऊन झाल्यावर गोंदवलेकर महाराज संस्थानच्या विश्वस्तांनी लगेचच जिल्हाधिकारी शेखर सिंह व पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांना पत्रे लिहून जिल्ह्यातील गरजूंना संस्थानकडून शिधा देऊ इच्छित असून तुम्ही त्याच्या वितरणाची व्यवस्था करावी, अशी विनंती केली.
पोलिसांकडून सर्वेक्षण करून तालुका स्तरावर नियोजन झाले. अगदी दुर्गम भागातील लोकांचा पोलीस पाटलांमार्फत सर्वेक्षण करून नक्की किती लोक गरजू आहेत, ते शोधले गेले. त्यानंतर संस्थान आणि पोलिसांची पथके कामाला लागली. साताऱ्याच्या प्रत्येक तालुक्यातून ट्रक संस्थानकडे येत आहेत. पोलीस यंत्रणा त्या त्या तालुक्यातील ठिकाणी धान्याच्या पाच-पाच किलोच्या पिशव्या बनवून व इतर आवश्यक वस्तूंची त्यात भर घालून गरजेनुसार त्याचे वितरण करत आहेत. किराणा मालातील ज्या वस्तू संस्थानकडे नाही, त्यांची खरेदी करण्यात येत असल्याचे
संस्थानच्या स्वयंपाकघराच्या कोठीत सेवा करणाऱ्या विठ्ठल लोमटे यांनी सांगितले. मदतीचा पहिला ट्रक मंदिराच्या आवारातून बाहेर पडत असतानाच दहा टन धान्य घेऊन एक ट्रक संस्थानमध्ये आला. दोन दिवसांपूर्वी एका व्यक्तीने संस्थानला फोन करून 15 टन धान्य पाठवून दिले. संस्थानमध्ये असे फोन येत राहतात आणि त्या पाठोपाठ मदतही येत राहते. नेहमी सेवा करणारे संस्थानचे अनेक कार्यकर्ते दिवसरात्र मेहनत घेऊन ही मदत गावोगावी पोहोचवण्यासाठी नियोजन करत आहेत.