मुंबई – निवडणूक आयोगाने शिंदे गट हीच खरी शिवसेना असल्याचा निकाल दिल्याच्या दुसऱ्या दिवशी ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी आपल्या गटाच्या समर्थकांची एक बैठक आयोजित केली होती. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना उद्देशून ते म्हणाले की, चोरांनी आपल्या पक्षाचे निवडणुक चिन्ह पळवले असून त्यांना धडा शिकवण्याची आता गरज आहे.
निवडणूक आयोगाची यंत्रणा भाजपची बटिक झाली आहे. त्यामुळे आता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निवडणुकांच्या तयारीला लागले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले. आपल्या मातोश्री निवासस्थानी जमलेल्या समर्थकांपुढे उद्धव ठाकरे यांनी मोटारीवर उभे राहून भाषण केले.
ते म्हणाले की मोदी किंवा भाजपला शिवसेनेला संपवणे कदापिही शक्य होणार नाही. समर्थकांना उद्देशून ते म्हणाले की तुम्ही घाबरलेले आहात काय? आता तुम्हाला देण्यासाठी माझ्याकडे काहीही नाही. त्यांच्या या वक्तव्याला जोरदार प्रतिसाद देत समर्थकांनी आम्ही घाबरलेलो नाही, तुम्ही आता फक्त आदेश द्या अशी सुचना उद्धव ठाकरे यांना यावेळी केली.
आता निवडणुकीत त्यांना धडा शिकवेपर्यंत शांत राहु नका, आता निवडणुकीच्या तयारीला लागा असे आवाहनही त्यांनी केले. ते म्हणाले की चोरांनी मधमाशांच्या पोळ्यावर दगड फेकला आहे. पण या पिसाळलेल्या मधमाशा कसा हल्ला करतात हे त्या दगड मारणाऱ्यांना समजणार नाही.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चोरलेला धनुष्यबाण पेलवणार नाही. ते रावणासारखे कोसळतील असे ते म्हणाले. ते म्हणाले की या आधी कोणत्याही राजकीय पक्षांच्या वादात निवडणूक आयोगाने कोणत्याही एका गटाला मूळ अधिकृतपक्ष म्हणून मान्यता आणि चिन्ह प्रदान केलेले नाही. अशा स्थितीत निवडणूक चिन्हच गोठवण्याची आजवरची परंपरा आहे. पण मोदींच्या बटिक यंत्रणेने हे कामही करून दाखवले आहे.
आता खरी शिवसेने कोणती हे लोकच ठरवतील. आता मोदींना सुद्धा बाळासाहेबांचाच मुखवटा धारण करून महाराष्ट्रात यावे लागेल. ठाकरे यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचीही बैठक घेऊन त्यांना पक्षाला बळ मिळवून देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात दौरा करण्याची सुचना केली.