बाबा रामदेव यांच्या पतंजली योग समितीने गोव्यातील मिरामार समुद्रकिनारी तीन दिवसीय योग शिबिराचे आयोजन केले आहे. शनिवारपासून सुरू झालेल्या या योग शिबिरात गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतही सहभागी झाले होते. यावेळी योगगुरू म्हणाले की, भारत हे जागतिक आरोग्य केंद्र व्हावे, हे आपल्या देशाच्या पंतप्रधानांचे स्वप्न आहे. गोवा हे आरोग्य केंद्र व्हावे, असे माझेही स्वप्न आहे. बाबा रामदेव म्हणाले की, पर्यटकांनी गोव्यात केवळ प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी येऊ नये तर रक्तदाब, शुगर, थायरॉईड, कॅन्सर आणि इतर आजारांवर उपचार करण्यासाठी यावे.
‘गोवा बनणार योग केंद्र’ –
बाबा रामदेव म्हणाले की, गोवा हे योग, आयुर्वेद, सनातन आणि अध्यात्म यांचे केंद्र बनले पाहिजे. दोन महिन्यांत गोव्यात फारसे पर्यटक येत नाहीत, अशा परिस्थितीत आपण येथे आध्यात्मिक पर्यटनाला चालना देऊ शकतो. यामुळे जगभरातील पर्यटक येथे भेट देण्यासाठी येणार आहेत. रामदेव यांनी राज्यातील हॉटेल उद्योगाला त्यांच्या ठिकाणी पंचकर्म सुरू करण्याचे आवाहन केले आणि येथे राहणाऱ्या पर्यटकांनाही योगाची सुविधा उपलब्ध करून द्यावी असे सांगितले. गोव्याची ओळख केवळ खाद्यपदार्थासाठी म्हणून करता कामा नये. जीवन म्हणजे फक्त खाणे, पिणे आणि मरणे असे नाही.
कोरोनानंतर कर्करोगाच्या रुग्णांमध्ये वाढ –
बाबा रामदेव यांनी कार्यक्रमादरम्यान दावा केला की, कोरोना महामारीनंतर देशात कर्करोगाचे रुग्ण वाढले आहेत. ते म्हणाले की, कोरोनानंतर लोकांची दृष्टी गेली आहे आणि त्यांच्या ऐकण्याच्या क्षमतेवरही परिणाम होत आहे. दुसरीकडे, गोव्याचे योगभूमीत रुपांतर करण्यासाठी पूर्ण सहकार्य करणार असल्याचे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले. कार्यक्रमानंतर बाबा रामदेव यांनी योगासनेही केली आणि त्यानंतर मीरामार बीचवर गेले. यावेळी गोव्याचे मुख्यमंत्रीही त्यांच्यासोबत होते. बाबा रामदेव यांनी वाळूतून शिवलिंग बनवून समुद्रकिनारी पूजा केली.