मुंबई – पद्मश्री लक्ष्मण माने यांच्यामुळे राज्यातील प्रत्येक वाडी वस्तीवर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पोहचेल, त्यांचे प्रश्न आम्ही सरकार दरबारी मांडू आणि त्यांना न्याय मिळवून देऊ, अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली.
जयंत पाटील यांच्या उपस्थितीत आज पद्मश्री लक्ष्मण माने यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यावेळी ते बोलत होते. मुंबई येथील प्रदेश कार्यालयात संपन्न झालेल्या या कार्यक्रमात पक्षाचे ज्येष्ठ नेते राजेश टोपे, आ. बाळासाहेब पाटील, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, युवक कार्याध्यक्ष सुरज चव्हाण उपस्थित होते.
जयंत पाटील पुढे म्हणाले की, ” लक्ष्मण माने यांनी खासदार शरद पवार यांची भेट घेऊन पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली. आज प्रदेशाध्यक्ष म्हणून मी त्यांचे पक्षात स्वागत करत आहे. गेली अनेक वर्षे माने राज्यातील भटक्या विमुक्त आणि वंचित घटकांसाठी काम करत आले आहेत. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत गेली 30 ते 40 वर्षे वाड्या-वस्त्यांवर जाऊन वंचित घटकांना एकत्र करत आहेत. त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी संघर्ष करत आहेत. शरद पवार यांनी आजवर समाजातील उपेक्षित वर्गासाठीच अधिक निर्णय घेतले आहेत. समाजात अजूनही असा मोठा वर्ग आहे की ज्यांना न्याय मिळालेला नाही. आता त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम आपल्याला करायचे आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा. @Jayant_R_Patil यांच्या उपस्थितीत आज पद्मश्री मा. लक्ष्मण माने यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. #NCP pic.twitter.com/n2DkwDvgzT
— NCP (@NCPspeaks) July 18, 2022
यावेळी एक जुनी आठवण सांगताना जयंत पाटील म्हणाले की, “मी 2003 साली अर्थमंत्री असताना लक्ष्मण माने यांची मंत्रालय परिसरात भेट झाली होती. अर्थसंकल्प सादर करण्याआधी त्यांच्या काही मागण्या आहेत का? असे विचारले. त्यांच्या मागणीनुसार मी अर्थसंकल्पात 33 वेगवेगळ्या जातींचा उल्लेख करुन त्यांच्यासाठी विशेष तरतूद केली होती. त्यावेळी महाराष्ट्राचा सामाजिक न्यायाचा अर्थसंकल्प म्हणून मी सादर केलेला अर्थसंकल्प प्रसिद्ध झाला होता. त्यावेळी वंचितांपर्यत पोहोचून जे काम आम्ही केले त्यामुळे 2004 साली विक्रमी संख्येने राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निवडून आले होते. माने यांच्यामुळे राज्यातील प्रत्येक वाडी वस्तीवर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पोहचेल, त्यांचे प्रश्न आम्ही सरकार दरबारी मांडू आणि त्यांना न्याय मिळवून देऊ, अशी ग्वाही यावेळी जयंत पाटील यांनी दिली.
“पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात येत असल्याचा आनंद होत आहे. शरद पवार यांनी भटके-विमुक्त घटकांना नेहमीच न्याय देण्याची भूमिका घेतली आहे. या वर्षात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा आहे. तसेच छत्रपती शाहू महाराजांचे हे जन्म शताब्दी वर्ष आहे. या वर्षाचे निमित्त साधून 31 ऑगस्ट रोजी विमुक्त दिन साजरा करण्याचा संकल्प त्यांनी जाहीर केला. शरद पवार यांच्या उपस्थितीत मोठा मेळावा घेऊन विमुक्त दिन साजरा करा. ”
– पद्मश्री लक्ष्मण माने(राष्ट्रवादी)
यावेळी लक्ष्मण माने यांच्यासह विलास माने, नारायण जावलीकर, शारदाताई खोमणे यांच्यासह एकूण 18 जणांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घड्याळ हाती बांधले.