नवी दिल्ली – नायजेरमधील भारतीयांनी लवकरात लवकर त्या देशातून बाहेर पडावे, असा सल्ला परराष्ट्र मंत्रालयाच्यावतीने तेथे वास्तव्य करणाऱ्या भारतीयांना दिला आहे. नायजेरमध्ये सध्या 250 भारतीय रहात आहेत. गेल्या महिन्यात सुरक्षा दलांनी अध्यक्षांचे अपहरण करून बंडाची घोषणा केल्यापासून नायजेरमध्ये अशांततेची परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर ज्यांनी नायजेरला जायचे नियोजन केले असेल, त्यांनी परिस्थिती सर्वसामान्य होईपर्यंत आपल्या नियोजनाचा फेरविचार करावा. तसेच तेथे रहात असलेल्या भारतीयांनी लवकरात लवकर तेथून बाहेर पडावे, असेही परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे.
नायजेरमध्ये वास्तव्याला असलेल्या भारतीयांनी नियामे येथील भारतीय दूतावासाच्या संपर्कात रहावे. भारतीय दूतावासाकडून भारतीयांच्या परतीच्या प्रवासाची सुविधा केली जात आहे. नायजेरमधील सर्व भारतीय सुरक्षित आहेत, असेही बागची यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.
“इकोवॅस’कडून हस्तक्षेपाची लक्षणे
नायजेरमध्ये पुन्हा लोकशाही प्रस्थापित करण्यात यावी, यासाठी पश्चिम आफ्रिकेतील देशांनी आपले सैन्य जमवाजमव करायला सुरुवात केली आहे. ही मुदत उलटून गेल्यामुळे आता संघर्षाची लक्षणे दिसायला लागली आहेत. जर कोणत्याही लष्कराने नायजेरमध्ये लष्करी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केल्यास ओलीस ठेवण्यात आलेले अध्यक्ष बेझौम यांना ठार मारण्यात येईल, असे बंडखोरांनी म्हटले आहे.
“इकोवॅस’ गटाचे सैन्य नक्की कोठे आणि किती प्रमाणात तैनात केले गेले आहे, याची माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही. मात्र नायजेरियाच्या नेतृत्वाखाली किमान 5 हजार सैनिकांना सज्ज राहण्याचे आदेश दिले गेले असू शकतील, असे काही तज्ज्ञांनी म्हटले आहे. याशिवाय प्रान्स आणि अमेरिकेचे मिळून 2,500 सैनिक नायजेरमध्ये तैनात आहेत. त्याशिवाय युरोपातील केही देशांचे लष्करी सहाय्यदेखील “इकोवॅस’ ला मिळण्याची शक्यता आहे.