सातारा (प्रतिनिधी) – करोनाला रोखण्यासाठी गावपातळीवर स्थापन करण्यात आलेल्या सोनके (ता. कोरेगाव) येथील करोना ग्राम दक्षता समितीला कोरेगावच्या प्रांताधिकारी कीर्ती नलवडे यांनी नोटीस बजावली आहे. गावात बाहेर गावावरून आलेल्या व्यक्तींची माहिती प्रशासनाला कळवली नाही, संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल केले नाहीत, असा ठपका या समितीवर ठेवण्यात आला आहे. दोन दिवसांत या समितीने खुलासा करण्याचे आदेश प्रांताधिकार्यांनी दिले आहेत.
सातारा जिल्ह्यात करोना वाढत असल्याने जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला आहे. त्यानंतर प्रत्येक ग्रामस्तरावर ग्राम दक्षता समिती स्थापन करण्यात आली. या समितीने करोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशा सूचना त्यांना देण्यात आल्या होत्या. याशिवाय बाहेरगावाहून येणाऱ्या नागरिकांना बंदी घालून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे अधिकार या समितीला देण्यात आले होते. मात्र, सोनके येथील ग्राम करोना सुरक्षा समितीने याबाबत दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. या समितीने बाहेरून आलेल्या लोकांची माहिती संकलित केली नाही. याशिवाय कोणावरही फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल केला नाही. बाहेरगावाहून आलेल्या एका व्यक्तीस करोना झाल्याचे शनिवारी निष्पन्न झाले. त्यानंतर प्रांताधिकारी किर्ती नलावडे यांनी नोटीस बजावली आहे.
सोनके गावचे सरपंच, गाव कामगार तलाठी, आरोग्यसेवक, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, सोसायटीचे सचिव, ग्रामपंचायत सदस्य सचिव, महिला बचत गटाच्या सचिव, महिला बचत गट ग्रामसंघ अध्यक्ष, पोलीस पाटील यांना ही नोटीस बजावली आहे.
आपणावर आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार गुन्हा का दाखल करू नये, अशी नोटीस बजावली आहे. याबाबत दोन दिवसांत खुलासा सादर करण्याचे आदेशही किर्ती नलावडे यांनी दिले आहेत. करोना उपाययोजनांबाबत ग्राम दक्षता समितीने हलगर्जीपणा केल्याचा आरोप करण्यात आला आहे.