छत्रपती संभाजीनगर – मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील राज्याच्या दौऱ्यावर आहेत. ठिकठिकाणी त्यांच्या सभेचे आयोजन केले जात असून सभांच्या माध्यमातून जरांगे पाटील आरक्षणाबाबत जनजागृती करत आहेत. आज सोमवारी जरांगे पाटील यांची छत्रपती संभाजीनगर येथे वेगेवगळ्या ठिकाणी सभा होणार आहे. वैजापूर येथेही त्यांची सभा होणार असून येथील सभेचे आयोजन करणाऱ्यांना पोलिसांकडून नोटीस देण्यात आली आहे. आजची सभा शांततेत पार पाडावी, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास सर्वस्वी आपण जबाबदार असाल असे वैजापूर पोलिसांनी नोटीसमध्ये म्हंटले आहे.
पोलिसांनी पाठविलेल्या नोटीसमध्ये काय म्हंटले आहे?
या नोटीसद्वारे आयोजकांना कळवण्यात येते की, आपण 09 ऑक्टोबर रोजी वैजापुर शहरात पंचायत समिती समोर सकल मराठा समाजाच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांच्या सभेचे आयोजन केले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी या आधी ओबीसी समाजाविरोधात प्रक्षोभक भाषण करून ओबीसी समाजाची मने दुखावले असल्याचे वैजापुर ओबीसी समाजाचे निवेदन प्राप्त झाले आहे.
त्यामुळे, सभेचे कार्यक्रम आपण शांततेत पार पाडावा. या कार्यक्रमावेळी काही अनुचित प्रकार घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास सर्वस्वी आपण जबाबदार राहाल. तसेच आपणावर कायदेशीर कारवाई करण्यात येवून सदर नोटीस त्यात पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे पोलिसांनी पाठवलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे.
मंगळवारी क्रीडा संकूलावर भव्य सभा –
छत्रपती संभाजीनगर शहरातील सूतगिरणी चौकातील विभागीय क्रीडा संकुलावर 10 ऑक्टोबरला सायंकाळी 5 वाजता मनोज जरांगे पाटील यांची विराट सभा आयोजित करण्यात आली आहे. मराठा क्रांती मोर्चाचे विजय काकडे पाटील आणि सुनील कोटकर यांनी या सभेचे आयोजन केले आहे. या संभेला लाखाहून अधिक लोक उपस्थित रहाणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. सभेला येणाऱ्या समाजबांधवाच्या वाहन पार्किंगची व्यवस्था कडा कार्यालयाच्या मैदानावर, जाबिंदा मैदानासह बीड बायपास रोडवर व्यवस्था करण्यात आली आहे. या सभेसाठी पोलीस प्रशानाकडे परवानगी मागितली आहे. सांयकाळपर्यंत परवानगीचे पत्र मिळेल, असेही कोटकर यांनी सांगितले.
नाशिकच्या सभेत जरांगे पाटील काय म्हणाले?
नाशिकच्या भाषणात मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आपले आंदोलन शेवटच्या टप्प्यावर आले असून ही निर्णायक लढाई आपल्याला लढावीच लागेल. मात्र शेवटच्या क्षणी सरकार आपल्या फूट पाडू शकत, ते काहीही डाव टाकतील. रात्रीतून काही करतील नेम नाही, मलाही किती वेळाला डाव टाकला, पण मी बधलो नाही, मी समाजाचे लेकरू म्हणून पुढं आलोय, ते सरकारला आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी.
म्हणून तुम्हाला आधीच सांगतोय, सरकारमध्ये लई नमुने असून कोण काय करेल नेम नाही. पण आता तुमच्या पाठिंब्यावरून असं वाटतंय की आता आता नाही फूट पडत. कारण सामान्य मराठ्याने हे आंदोलन हातात घेतले आहे. त्यामुळे आता बैल चोरीला जायच्या आधी गोठ्यात बांधला तर काय होईल, हे लक्षात घ्या… असे कळकळीचे आवाहन जरांगे यांनी केले आहे.
ओबीसीमधूनच आरक्षण पाहिजे – जरांगे पाटील
आम्ही ओबीसी मध्येच आहोत, कुणबी मराठा आहोत. त्यामुळे ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे. आणि या मागणीला कुणी ओबीसी नेते विरोध करत असतील तर त्याला अर्थ नाही, असे सांगत नियोजित येवला येथील सभेचा रूट ठरला होता म्हणून जातो आहे. येवल्यात जातोय, यात वेगळे काही नाही.
समता परिषदेने विरोध केला, हा द्वेष का पसरवित आहेत. याचा अर्थ तुम्ही संविधानिक पदाचा गैर वापर केला जात आहे. एकीकडे चार दिवसांत कायदा पारित होणार नाही, म्हणून आम्ही त्यांना 40 दिवस दिले आहेत. 1 महिना 14 तारखेला पूर्ण होतो आहे, त्यामुळे सरकारने गांभीर्याने घ्यावे, तसं मुख्यमंत्री म्हणाले की, ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही. मात्र आम्ही ओबीसीमध्येच आहोत, कुणबी मराठा आहोत, त्यामुळे ओबीसीमधूनच आरक्षण पाहिजे, कुणी ओबीसी नेते विरोध करत असतील तर त्याला अर्थ नसल्याचे जरांगे म्हणाले.
मनोज जरांगे पाटील यांच्या सभेला मोठा प्रतिसाद –
मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात उपोषण केले. 16 व्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते फळांचा रस प्राशन त्यांनी उपोषण सोडले. यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थितांशी संवाद साधला. त्यांनी म्हटले की, आज राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या उपोषणस्थळी आले आहेत. मराठा समाजाला एकनाथ शिंदेंच न्याय देऊ शकतात, ही माझी भावना आहे. ते आज इथे आलेत म्हणून मी ही गोष्ट म्हणत नाही. पण ते आरक्षण देतील, हा माझा विश्वास आहे. शासनाची मागणी होती की, आम्हाला एक महिन्यांचा वेळ द्या. आपण त्या पद्धतीने एक महिन्यांचा वेळ दिला आहे. 31 व्या दिवशी सरकार आपल्या मराठ्यांना कुणबी दाखले देईल, असा विश्वास आहे, असे मनोज जरांगे यांनी म्हटले.
दरम्यान सध्या मराठा आरक्षण संदर्भात जनजागृतीसाठी मनोज जरांगे पाटील महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. ठिकठिकाणी त्यांची सभा होत असून त्यांच्या सभेला मोठा जनसमुदाय उपस्थित असतो. सभांना मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे.