डॉ. विनिता परमार
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने विज्ञान-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील महिलांची उदाहरणे सांगायची झाल्यास अनेकांना-अगदी सुशिक्षितांनाही मोजकीच नावे सांगता येतील. “गरज ही शोधाची जननी असते,’ हे आपण सर्रास म्हणतो. अशाच काही “शोधांच्या जननीं’चे स्मरण…
प्राचीन काळापासून महिला त्यांना उपजत लाभलेल्या गुणसूत्रांमधील गुणवैशिष्ट्यांमुळे सृजनाचे कार्य करत आल्या आहेत. पण प्रत्येक युगामध्ये सामाजिक स्थितीत स्त्रीची स्थिती बदललेली दिसून येते. आज विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत महिलांचे नाव तुलनेने कमी पुढे येते. परंतु पाषाण काळापासून ते नवपाषाणाचा विचार केल्यास भोजनाचा शोध महिलांनीच लावला असावा, असे वाटते. धान्याचे पीठ करणे आणि पीठापासून पोळी तयार करण्याचे काम महिलांशिवाय कोणीच करू शकत नाही, असे म्हणता येईल. कालांतराने संस्कृती, परंपरा आणि सभ्यता यात विकास झाल्याने तंत्रज्ञानात महिलांचे योगदान वाढले.
महाभारत काळापासून महिलावर्गाचे पतन सुरू झाले आणि ते मध्ययुगीन काळापर्यंत महिलांना गुलामाप्रमाणेच वागणूक दिली जाऊ लागली. दासी आणि उपभोगाचे साधन म्हणून महिलेकडे पाहिले जात होते. भारताचा विचार केल्यास प्रारंभीच्या काळात विज्ञान क्षेत्रात महिलांना कमी प्रोत्साहन दिले गेले. परंतु हे प्रोत्साहन कमी स्वरूपात का असेना अगोदरपासूनच दिले जात होते, हेदेखील लक्षात घ्यायला हवे. प्राचीन काळात घोषा, लीलावती, गार्गी यांची नावे उल्लेखनीय आहेत. अरुंधतीला आजही ताऱ्याच्या रूपात पाहून भारतीय महिलावर्ग मंगलकामना करतात. मध्ययुगीन काळ हा महिलांचा श्वास गुदमरणारा काळ होता. तरीही अशा कोंडीकाळात गुलबदन बेगम यांनी गुलाबापासून अत्तर तयार करून मोठा शोध लावला.
स्वातंत्र्यपूर्व काळात भारतात देशातील पहिली मुलींची शाळा सुरू करणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्या अफाट जिद्दीमुळे आज आधुनिक काळातील स्त्रियांची भरारी दृष्टीस पडत आहे. त्याकाळात त्यांनी अंगावर शेणगोळ्यांचा मार सोसूनही मुलींच्या शिक्षणासाठीचे अतुल्य कार्य सुरू ठेवले; कारण त्यांच्या डोळ्यात उद्याच्या भारताचे स्वप्न होते. स्त्री शिकली की कुटुंब साक्षर होते, हे त्यांनी जाणले होते. भारतात शास्त्र शिक्षणात पहिले नाव आनंदीबाई जोशी यांचे येते. त्यांनी 1886 मध्ये अमेरिकेत फिलाडेल्फिया विद्यापीठातून वैद्यकीय शास्त्रातील पदवी मिळवली.
तंत्रज्ञान आणि वैज्ञानिक जीवनशैली ही आपण पूर्वजापासून अंगीकारली आहे. मात्र, त्याची नोंद कोठे झालेली नाही किंवा पेटंटसाठी नाव नोंदले गेले नाही. त्यामुळे अनेक शोध भारतीयांच्या नावावर नोंदले गेलेले नाहीत. लहानपणापासूनच आपण गरज ही शोधाची जननी आहे, असे ऐकत आलो आहोत. दररोजच्या जीवनात कार्य पार पाडताना येणाऱ्या अडचणी दूर करताना त्या-त्यावेळी नानाविध शोध लावण्यात आले.
जगातील काही देशांतीलच महिलांनी आपल्या संशोधनातून जगाचे कामकाज सुलभ करण्याचे प्रयत्न केले. मुलांचे पालनपोषण करताना येणाऱ्या अडचणी पाहून मारियन डोनोवन यांनी 1946 मध्ये डायपरचा शोध लावला. तर चाइल्ड कॅरियरचा शोध पिस्किपर एन. मुरे हिच्यासारख्या महिलेने लावला.
भांडी घासताना येणाऱ्या अडचणी पाहून डिशवॉशरचा शोध जोसेफन कोचरने लावला. पूर्वीच्या काळी पोळी तयार करण्याच्या मुद्द्यावर कितीतरी संयुक्त कुटुंबामध्ये वादविवाद व्हायचे. परंतु पोळी तयार करण्यावर तोडगा काढला आणि ऑटोमेटिक रोटीमेकरचा शोध नागरिका इसरानी नावाच्या महिलेने लावला. गाड्यांच्या काचा साफ करणाऱ्या विंडस्क्रिन वायपरचा शोध मेरी अँडरसन यांनी 1903 मध्ये लावला. तसेच मुलींचे कुरळे केस सरळ करण्याची हौस भागवण्यासाठी हॉट कॉम्बचा शोध ऍनी मलाने यांनी लावला.
खाण्यापिण्याचा शौक बाळगणारे वेकफील्ड ब्रॅंडला चांगले जाणून आहेत. चॉकलेट चिप कुकीजची निर्मिती पहिल्यांदा 1938 मध्ये रुथ ग्रेटस वेकफील्ड यांनी केली. ऍथेन्स येथे डॉक्टर ऍगनोडिस यांनी महिला डॉक्टरला देखील पुरुषाप्रमाणे लॅब कोट मिळावा यासाठी आंदोलन केले होते. मारिया सिब्ला मारियनने पहिल्यांदा फुलपाखरांच्या स्थलांतराचा अभ्यास केला. तर जॉय एडमसन यांना आपल्या पतीने एका सिंहिणीची केलेली हत्या आवडली नव्हती आणि त्यामुळे त्यांनी त्यास विरोध केला.
संरक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देताना “बॉर्न फ्री’ नावाचे प्रसिद्ध पुस्तक लिहिले होते. नोबेल शांती पुरस्कार विजेत्या वांगारू मथाईचे हरित मार्ग आंदोलन हे तर सर्वांनाच ठावूक आहे. डीडीटीवर बंदी आणण्यासाठी रेचल कर्सन यांनी “सायलेंट स्प्रिंग’ नावाचे पुस्तक लिहिले होते. चीनने सुमारे दोन हजार वर्षांपर्यंत रेशमच्या किड्यापासून रेशमी सूत काढण्याचे तंत्र लपवले होते. कालांतराने हा शोध एक चिनी महिला जिलिंशी यांनी लावल्याचे उघड झाले. आधुनिक संगणक काळात कोबोल भाषेचा शोध देखील ग्रेसर हुपर या महिलेने लावला.
फ्लोरेन्स नाइटेंगल यांना आधुनिक नर्सिंगच्या उद्गात्या मानले जाते तर कलेरा बर्टन यांना रेड क्रॉसचे जनक मानले जाते. जगातील वाढत्या लोकसंख्येने चिंतीत होऊन पहिले जन्म नियंत्रण क्लिनिक 1916 मध्ये मार्गेट सैंगर यांनी सुरू केले. मेरी क्युरी यांनी 1903 मध्ये पदार्थविज्ञानातील संशोधनामुळे आणि 1911 रोजी रसायनशास्त्रातील संशोधनामुळे दोन वेळा नोबेल पुरस्कार पटकावले. केंद्रीय विखंडनच्या (नाभिकीय विखंडन) संशोधनासाठी नोबेल पुरस्कार विजेते ऑटो हान यांच्यासमवेत लीज मिटनर यांनी देखील कार्य केले होते. परंतु त्यांना श्रेय मिळाले नाही.
भारतात लीलावती, गार्गी, घोषा, अपाला, कादम्बिनी गांगुलीपासून टेसी थॉमस, सुनीता विलियम्सपर्यंतचा महिला वर्गाचा प्रवास मोठा आहे. संघर्ष प्रत्येक ठिकाणी आहे. गरज आहे ती मार्गदर्शन आणि प्रोत्साहनाची. मंगळ मिशन मोहिमेत पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या महिलांनी उपग्रह प्रक्षेपणात मोठे योगदान दिले.
प्रतिभावान, सर्जनशील महिलांची ही यादी म्हणजे सूर्यमालेतील एखाद्या ठिपक्याइतकी आहे. यामध्ये अनेक महिलांचा नामोल्लेख करता आला नाही. असे असताना अशा प्रतिभावान भारतीय महिला शास्त्रज्ञांबद्दल अनेक भारतीयांना आजदेखील माहिती नाही. जर आपण शाळेतील मुलांना महिला शास्त्रज्ञांची नावे विचारली तर मुले मेरी क्यूरी यांचेच नाव सांगू शकतील. मात्र यामध्ये एखाद्या भारतीय महिला शास्त्रज्ञाचे नाव मुलांकडून ऐकायला मिळणार नाही.
यामागे अनेक कारणे आहेत. आपल्या शालेय पुस्तकात, माध्यमांत आणि शिकलेल्या लोकांत या महिलांचा उल्लेखच दिसून येत नाही. कोणत्याही कार्यक्रमाचा प्रमुख पाहुणा हा राजकीय नेता असतो किंवा संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञाला बोलावण्यात येते. या व्यवस्थेत बदल करणे अपेक्षित आहे. आजच्या महिला करिअरबरोबरच कुटुंबही यशस्वीपणे सांभाळत आहेत. महिलावर्ग हा प्रतिभा आणि मेहनतीच्या जोरावर विशेषत: देशाची सेवा करत आहे.