– राहूल गोखले
एके काळी राजकारणात प्रवेश करणाऱ्या व्यक्ती या त्याग, समर्पण, निष्ठा यासाठी ओळखल्या जात. अर्थात, हे चित्र बदलून देखील बराच काळ लोटला आहे आणि आता लंबक दुसऱ्या टोकाला गेला आहे. श्रेयवाद, सत्तालोलुपता आणि साथीला प्रसिद्धीलोलुपता इथवर लंबक सरकला आहे.
गरिबांना अन्न दिले जाणाऱ्या पोत्यांवर आपल्या नेत्याचे छायाचित्र असलेच पाहिजे, असे त्या नेत्याच्या पाठीराख्यांना वाटते आणि नेता गावा-शहरात येणार असेल तर त्याच्या स्वागताच्या निमित्ताने आपणही झळकून घ्यावे या हेतूने रस्ते होर्डिंगनी भरून जातात. विमानतळापासून साध्या उड्डाणपुलाच्या उद्घाटनापर्यंत रस्सीखेच असते आणि प्रत्येक काम आपल्यामुळेच कसे झाले हे भासविण्याची अहमहमिका लागल्याची उदाहरणे कमी नाहीत.
आपल्या नेत्याची स्तुती करण्याची चढाओढ ही नेत्याला देवत्व बहाल करण्यापर्यंत जाते. कोणतीही मदत समाजघटकांना केली तर त्याची छायाचित्रे काढून समाजमाध्यमांत ती झळकावण्याची स्पर्धा लागलेली असते. त्या स्पर्धेचे काहीदा ओंगळवाणे स्वरूप समाजमाध्यमांवर दिसते.
प्रसिद्धी आणि आपापल्या नेत्यांची स्तुती यांपासून कोणताच पक्ष अस्पर्शित राहिलेला नाही. याचा असाही परिणाम होऊ लागतो की नेत्यालाही हे सर्व पसंत पडू लागते. किंबहुना आपली प्रशंसा करणारे अधिक निकटचे वाटू लागतात आणि कामगिरीपेक्षा वैयक्तिक निष्ठा हा मूल्यमापनाचा मोठा निकष ठरू लागतो. हे थांबवणे लगेचच शक्य नसले तरी त्या दृष्टीने प्रयत्न अवश्य करता येऊ शकतो आणि तो नेतृत्वाच्या पातळीलाच व्हायला हवा.
याचे कारण समर्थक आणि अनुयायी हे सामान्यतः नेतृत्वाचे अनुकरण करीत असतात. आपल्या नेत्याला काय आवडते हे पाहून ते करायचे आणि नेत्याच्या नजरेत आपले स्थान बळकट करायचे अशी “व्यूहनीती’ अनेकजण आखत असतात. तेव्हा या प्रसिद्धीलोलुपतेतून आणि स्तुतिप्रियतेतून बाहेर पडायचे तर नेतृत्वाच्या पातळीला काही प्रयत्न व्हायला हवेत. त्यासाठी मुळात आपल्या कामाची प्रसिद्धी ही आपल्या कामातूनच अधिक प्रभावीपणे होऊ शकते यावर विश्वास वाढायला हवा.
आपल्याखेरीज कोणीही कामगिरी करू शकत नाही आणि त्यामुळे आपल्याखेरीज कोणीही प्रशंसेस पात्र नाही या भ्रमातून बाहेर पडले पाहिजे. प्रसंगी विरोधकांच्या कामगिरीची दखल घेतली तर यांतून शिसारी येणारी प्रसिद्धीलोलुपता कमी होण्याची शक्यता वाढतेच पण राजकारणातील विखार कमी होण्याचा संभव असतो. यासाठी तमिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी टाकलेले पाऊल उल्लेखनीय ठरते.
तमिळनाडूमध्ये द्रमुक आणि अण्णाद्रमुक यांच्यामधील राजकारण किती विखारी होते हे सर्वश्रुत आहे. करुणानिधी आणि जयललिता हे परस्परांचे राजकीय विरोधक होतेच; पण प्रसंगी त्याचे रूपांतर शत्रुत्वात होते की काय असे बाका प्रसंग उभे राहात. आता करुणानिधी हयात नाहीत आणि जयललिता यांचे निधन झाले आहे. बहुधा या बदललेल्या वातावरणात विखार कमी झाला असावा; पण तो आणखी कमी व्हावा म्हणून स्टॅलिन प्रयत्न करीत आहेत असे म्हटले पाहिजे. तमिळनाडूतील विद्यार्थ्यांना 65 लाख मोफत स्कूलबॅगचे वितरण करण्यात आले.
मात्र, त्या बॅगेवर अगोदरच्या मुख्यमंत्र्यांचे छायाचित्र होते कारण ही योजना अगोदरच्या सरकारची होती. जेव्हा शालेय शिक्षण मंत्री पोय्यमोझी यांनी ही बाब स्टॅलिन यांच्या निदर्शनास आणून दिली तेव्हा स्टॅलिन यांनी ते छायाचित्र कायम ठेवावे असे निर्देश दिले. मंत्रिपदी असताना पक्ष कार्यकर्त्यासारखे बोलू नका अशी समजही स्टॅलिन यांनी मंत्र्यांना दिली. यातून सरकारी तिजोरीतील तेरा कोटी रुपयांची बचत झाली हा एक भाग; पण पुढच्या वेळी मंत्री असले प्रस्ताव घेऊन आपल्या स्वामी निष्ठेचे प्रदर्शन आपल्या नेत्यांसमोर मांडताना दहा वेळा विचार करेल ही यातील अधिक जमेची बाजू.
अटलबिहारी वाजपेयी जनता पक्ष सरकारमध्ये परराष्ट्र खात्याचे मंत्री झाले; तेव्हा बहुधा त्यांना खूश करण्यासाठी त्यांच्या दालनातील पंडित नेहरूंचे छायाचित्र कोणीतरी काढून टाकले; तेव्हा वाजपेयी यांनी ते पुन्हा जिथे होते तिथे लावायला सांगितले याचे येथे स्मरण होईल. स्टॅलिन यांनी करोना व्यवस्थापन समिती नेमली. त्या समितीत सर्वपक्षीय सदस्यांना त्यांनी स्थान दिले. मावळत्या अण्णा द्रमुक सरकारमधील आरोग्य मंत्री राहिलेले सी. विजयभास्कर यांचाही त्यात समावेश होता हे महत्त्वाचे. त्याखेरीज भाजप, कॉंग्रेस, पीएमके, सीपीआय आदी पक्षातील सदस्य या समितीत समाविष्ट आहेत.
मात्र या सगळ्यावर चांगल्या अर्थाने स्टॅलिन यांनी कडी केली ती त्यांनी आपल्या मंत्र्यांना आणि द्रमुक आमदारांना केलेल्या सूचनेने. कोणत्याही परिस्थितीत आपली वैयक्तिक प्रशंसा करू नका अशी त्यांनी सूचना केली. कोणतेही विधेयक सादर करताना किंवा आपापल्या मंत्रालयांसाठी आर्थिक तरतुदींविषयी बोलताना प्रशंसा करायचीच तर ती आपल्याला ज्यांचा वारसा लाभला आहे त्यांची करावी; पण आपली मुळीच करू नये असे त्यांनी सांगितले. आताच्या काळात हे दुर्मिळ म्हटले पाहिजे.
तरीही एका मंत्र्याने एक विधेयक मांडताना बहुधा सवयीने स्टॅलिन यांची प्रशंसा केलीच; तेव्हा स्टॅलिन यांनी आपली प्रशंसा करू नये ही आपली सूचना नसून तो आपला आदेश आहे, असा सज्जड दम भरला. जयललिता यांच्या निधनानंतर अण्णा द्रमुक सरकार काहीसे अस्थिर झाले असताना देखील स्टॅलिन यांनी ते सरकार पाडण्यासाठी प्रयत्न करण्यास नकार दिला होता आणि निवडणुकीच्या मार्गानेच आले तरच आपण सरकार बनवू अशी भूमिका घेतली होती, हेही येथे नमूद करावयास हवे.
यत्रतत्र सर्वत्र आपलीच छबी असावी म्हणून अट्टहास बाळगला जात असल्याच्या काळात स्टॅलिन यांनी प्रगल्भता दाखविली आहे असेच म्हटले पाहिजे. स्टॅलिन यांचा हा वस्तुपाठ अन्य पक्षांनी घेतला तर राजकारण काही अंशी तरी कमी विखारी आणि अधिक समंजस होण्यास हातभार लागेल यात शंका नाही.