ऍड. ऋषीकेश काशिद
आज राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस. भोपाळ गॅस दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या स्मरणार्थ देशात दरवर्षी हा दिवस पाळला जातो. आज या घटनेला तब्बल तीन तप म्हणजेच 36 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने घेतलेला या घटनेचा आढावा…
2 डिसेंबर 1984 ची रात्र ही भोपाळ शहराची काळरात्र ठरली. युनियन कार्बाइड या कीटकनाशक बनवणाऱ्या कारखान्याच्या एका टाकीतून मिथाइल आयसोसायनेट (एमआयसी) या प्राणघातक वायूची गळती झाली. संपूर्ण रात्रीत भोपाळ शहर व आसपासच्या परिसराचे रूपांतर एका गॅस चेंबरमध्ये झाले. सरकारी आकडेवारीनुसार या दुर्घटनेनंतर काही तासांमध्येच जवळपास 3 हजार लोकांचा मृत्यू झाला होता. पण बिगर-सरकारी स्रोतांनुसार ही संख्या जवळपास 25 ते 30 हजार होती. मृत्यूचं हे सत्र पुढची अनेक वर्षे सुरू होतं. त्यानंतरच्या गेल्या 35 वर्षांत किती माणसे अपंग झाली अथवा जीवास मुकली त्याची गणनाच नाही. या दुर्घटनेत आजवर हजारोंचा बळी गेल्याचं म्हटलं जातं. युनियन कार्बाइडच्या कारखान्यातून त्या रात्री सुमारे 40 टन वायूची गळती झाली होती.
मिथाइल आयसोसायनेट (एमआयसी) हे एक विषारी रसायन आहे जे पॉलीयुरेथेन फोम, कीटकनाशके आणि प्लॅस्टिकच्या निर्मितीमध्ये वापरले जाते. हे द्रव स्वरूपात हाताळले जाते. त्याचे सहजपणे ज्वलन आणि स्फोट होऊ शकतो. त्याचे हवेत वेगाने बाष्पीभवन होते. मिथेल आयसोसायनेट थंड वातारणात ठेवला जातो. खासकरून सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून पाण्यापासून दूर ठेवला जातो. पाण्याच्या संपर्कात येताच मिथेल आयसोसायनेटवर तीव्र रासायनिक अभिक्रिया होते, त्यामुळे मोठ्या प्रमाणात विषारी गॅसची निर्मिती होऊन प्रचंड उष्णताही तयार होते. भोपाळच्या कारखान्यात एमआयसी पासून शेतीच्या कामासाठी सेविन व टेमिक ही कीटकनाशके बनवली जात.
युनियन कार्बाइड कारखान्यातील 610 क्रमांकाच्या टाकीतील विषारी मिथाइल आयसोसायनेट वायूचा पाण्याशी संपर्क आला. या टाकीला गळती लागली ती एका स्फोटामुळे आणि या स्फोटाला कारणीभूत ठरले एमआयसीचे वाढलेले तापमान. स्फोट झाला ती टाकी होती स्टेनलेस स्टीलची. त्याला जोडणाऱ्या दोन स्टीलच्या नळ्या द्रवरूप नायट्रोजन आणि एमआयसी टाकीत वाहून आणत. या नळ्यातून पाणी आत आले.
टाकीतील वाढलेल्या 55 पास्कलपेक्षा जास्त दाबामुळे व 110 अंश सेल्सियसपेक्षा जास्त तापमानामुळे दाबमापक व तापमानमापक यंत्रणा कोलमडून पडली. त्यामुळे सेफ्टी व्हॉल्व उडून एमआयसी बाहेर आला. काही शास्त्रज्ञांच्या मते एमआयसी बाहेर आल्यानंतर त्याचे नैसर्गिक विघटन झाले व त्यातून फॉसिजीन वायू बनला. फॉसिजीन हा प्रचंड विषारी वायू आहे. एक फॉसिजीनची बाटली एका बॉम्बचे काम करते, असे अभिप्राय शास्त्रज्ञांनी नोंदवले आहेत.
कडाक्याच्या थंडीच्या रात्री निद्रिस्त असलेले भोपाळ शहर पहाटे दोनच्या सुमारास जागे होऊ लागले. कारखान्याच्या जवळच दाट लोकसंख्येची झोपडपट्टी होती तर भोपाळ स्टेशन 2 किमी अंतरावर व त्यापुढे शहर आहे. लोक गाढ झोपेत असताना अचानक त्यांचा श्वास कोंडला जाऊ लागला. काहीजण कसेबसे दवाखान्यात पोहचले तर काहीजणांचा झोपेतच मृत्यू झाला. दवाखान्यात लोकांवर नेमके काय उपचार करायचे हे सुरुवातीला डॉक्टर्सनाही माहीत नव्हतं. कारण यापूर्वी असं कधीच घडलेलं नव्हतं. काही क्षणातच भोपाळमधील रस्ते, गल्ल्या आणि घरांमध्ये मृतदेहाचा अक्षरश: खच पडला होता.
रस्त्यावर अनागोंदी पसरली होती. लोक सैरावैरा धावत होते. त्यात काहींना रक्ताच्या उलट्या, चक्कर येणे, तीव्र खोकला येत होता. सुमारे लाखभर लोकांनी सुरक्षित ठिकाणी पलायन करत आपला जीव वाचवला. शहरात ठिकठिकाणी पडलेले मृतदेह रुग्णालयात ट्रकमध्ये भरून आणण्यात आले होते. शवविच्छेदन करून बहुतांश मृतदेहांवर सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात आले होते. मुक्या जनावरांना देखील याची बाधा झाली. विषारी वायूची बाधा होऊनही जे जगले, ते अद्याप त्या घटनेचे घाव सोसत आहेत.
त्यानंतर सकाळी 6 नंतर ही बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण जगाच्या कानाकोपऱ्यात पसरू लागली. भोपाळची दुर्घटना घडल्यानंतर युनियन कार्बाइडचे पश्चिम व्हर्जिनिया व जॉर्जिया येथे असलेले प्रकल्प ताबडतोब बंद केले. अर्थात, तेथे एमआयसी तयार करत नव्हते. एमआयसी फक्त भारतात तयार होत होते. युनियन कार्बाइड कारखान्याचे अध्यक्ष वॉरन अँडरसन याला कारखान्यातील विषारी वायूगळती प्रकरणाचा मुख्य आरोपी म्हणून नाव घेण्यात आले होते. डॅन करझमन यांनी लिहिलेल्या “अ किलिंग विंड’ पुस्तकानुसार अँडरसन कार्बाइडच्या विश्रामगृहात पोहोचला. तेथे अँडरसनला ताब्यात घेतले गेले. पण चार-पाच तासांतच त्याला जामीन मिळाला. फक्त जामीनच नव्हे तर त्याची भोपाळहून व देशातून पळ काढण्याचीही व्यवस्था केली गेली होती. यानंतर त्याच्याविरोधात न्यायालयात सुनावणी घेण्यात आली. त्याला अमेरिकेतून प्रत्यार्पणाचे प्रयत्न करण्यात आले; पण तो कधीही भारतात परतला नाही. अँडरसन 1986 मध्ये निवृत्त झाला. अमेरिकेत 29 सप्टेंबर 2014 रोजी वयाच्या 92 व्या वर्षी त्याचे निधन झाले.
सुप्रीम कोर्टाच्या मध्यस्थीने भारत सरकारने युनियन कार्बाइडकडून 713 कोटी रुपये नुकसान भरपाई म्हणून घेतली असल्याचे सूत्र सांगतात. या घटनेने सुमारे एक ते सव्वा लाख व्यक्ती प्रभावित झाल्या. त्यापुढे ही रक्कम अगदीच तुटपुंजी ठरली. नुकसान भरपाईची रक्कम घेताना एक तडजोड करण्यात आली. या नुकसान भरपाईच्या बदल्यात युनियन कार्बाइडविरोधातले सगळे प्रलंबित खटले बंद करण्याचं सरकारने मान्य केलं. 2000 साली युनियन कार्बाइड कंपनी ही डाऊ केमिकल्स या अमेरिकन कंपनीने विकत घेतल्याने हे प्रकरण गुंतागुंतीचे झाले.
1987 साली दिल्ली येथील कीर्तीनगर परिसरातील 2 लाख लोकसंख्येच्या मध्यभागी श्रीराम फुड्स ऍन्ड फर्टिलायजर कारखाना आहे. ओलियम हे सल्फुरिक ऍसिड मधील सल्फर ट्रायॉक्साइडचे द्रावण होय. त्यास पायरोसल्फुरिक ऍसिड म्हणून देखील ओळखतात. त्याची गळती होऊन एकाचा मृत्यू झाला. परंतु भोपाळ घटना ताजी असल्याने दिल्लीकर हादरून गेले. न्यायालयाने 11 अटी घालून तो प्रकल्प चालू करण्यास परवानगी दिली. पालघर जिल्ह्यातील बोईसर औद्योगिक क्षेत्र म्हणजे महाराष्ट्रातील असुरक्षित औद्योगिक वसाहत. लहान-मोठ्या अशा दीड हजार कंपन्या, कारखाने असलेल्या या ठिकाणी कारखान्यांमधील विविध अपघात व आगीच्या घटनांमुळे दरवर्षी सरासरी 25 कामगारांचा मृत्यू होतो. 26 मे 2016 रोजी डोंबिवली औद्योगिक वसाहतीमध्ये प्रोबेस कंपनीतील केमिकल रिऍक्टरचा स्फोट होऊन 13 कामगारांचा मृत्यू झाला.
यावर्षी लॉकडाऊन काळात 7 मे 2020 च्या पहाटे आंध्रप्रदेशातील विशाखापट्टणम येथील एलजी पॉलीमर्स या कंपनीत स्टायरीन या वायूची गळती झाल्यामुळे 13 जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. एकूण 5 हजार जणांना या वायूगळतीची बाधा झाली, तर शेकडो बाधित झाले. या विषारी वायूच्या गळतीचा तीन किमीच्या परिसरावर परिणाम झाला. यानिमित्ताने पुन्हा एकदा भोपाळ वायूगळतीच्या कटू आठवणी जाग्या झाल्या.
अशा औद्योगिक दुर्घटना रोखण्यासाठी कारखान्यातील सुरक्षाविषयक बाबींचे तसेच सरकारी सूचनांचे काटेकोरपणे पालन व्हावे.