-सुनील चोरे
जन्म-मरणाचा फेरा कुणालाच चुकलेला नसला तरी जन्माचं स्वागत आणि मरणाचं दुःखही टळत नाही; पण काही व्यक्तींचं जाणं हे केवळ त्या कुटुंबासाठी किंवा त्यांच्या आप्तेष्टांसाठीच नव्हे तर समाजासाठी वेदनादायी ठरतं. कारण त्यांना आदर्श मानून अनेकांची वाटचाल सुरू असते. त्यांच्या कार्यकर्तृत्त्वातून प्रेरणा घेत उदयोन्मुख, नवोदित व्यक्ती मार्गक्रमण करत असतात. अशा वेळी हे प्रेरणादायी बेट एकाएकी नाहीसं होतं तेव्हा अनाथपणाची भावना मनात येते. डॉ. शीतलताई आमटेंच्या जाण्यानं आज तीच मनःस्थिती अनेकांची झाली आहे.
डॉ. शीतल आमटे ह्या जेमतेम चाळीशीच्या उमद्या सामाजिक मनाला स्वतःला संपवावे वाटले. बाबा आमटे आणि आमटे परिवाराचा अविरत आणि निःस्पृह समाजसेवेचा वसा बाळकडू म्हणून घेत उभ्या असलेल्या, हजारो मनांना उभारी देणाऱ्या ह्या मनाला का असा घाव बसावा? ट्विटरवर निधनापूर्वी काही तासांपूर्वीचे त्यांचे कॅनव्हास पेंटींग दिसले होते. त्याचे शीर्षक होते युद्ध आणि शांतता. अशा कुठल्या युद्धाच्या जखमा शांत करण्यासाठी त्या निघून गेल्या? कित्येक दशके वंचितांच्या झोळीत आनंद पेरणाऱ्या आनंदवनला, भरलेल्या आमटे परिवाराला आणि आपल्या कोवळ्या सहा वर्षांच्या शार्विलला कायमचे सोडून जातानाच्या वेदना त्या माऊलीलाच ठाऊक.
तब्बल 71 वर्षांपासून चालू असलेला आजोबा-आजी बाबा आमटे, साधनाताई आमटे, आई-वडील डॉ. विकास- डॉ. भारती आमटे यांच्यासह संपूर्ण आमटे कुटुंबीयांचा समाजसेवेचा वारसा पुढे चालवण्याच्या ध्यासाने डॉ. शीतल यांनी 2003 मध्ये नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस पूर्ण केले. पुढे त्या निष्णात अपंगतज्ज्ञ बनल्या. सामाजिक उद्यमता (सोशल आंत्रप्रेनरशिप) हा अभ्यासक्रम पूर्ण केला. त्या हेमलकसा, आनंदवन, सोमनाथ येथील संस्थांचे वित्त नियोजन करत होत्या. आनंदवनच्या त्या मुख्य कार्यकारी अधिकारी होत्या. वयाच्या चाळिशीच्या आत केलेल्या या अजोड कार्याबद्दल “वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’ने मार्च 2016 मध्ये “यंग ग्लोबल लीडर’ म्हणून त्यांची निवड केली होती. पुढे अमेरिकेत जाऊन हार्वर्ड विद्यापीठातून लीडरशिपचा कोर्सही शीतल यांनी पूर्ण केला होता. मेडिकल प्रोफेशनल्ससाठीच्या लीडरशिप क्षेत्रात “लॅन्सेट कमिशन ऑन ग्लोबल सर्जरी’ सोबत “मशाल’ आणि “चिराग’ असे दोन प्रशिक्षण कार्यक्रम त्यांनी सुरू केले.
ग्रामीण संस्कृतीचे रक्षण आणि रोजगाराच्या संधी मिळून तरुणाईचे शहराकडे पलायन थांबवणं, हा ध्यास घेतलेल्या डॉ. शीतल आमटे-करजगी यांना आनंदवनला “स्मार्ट व्हिलेज’ बनवायचे होते. तांत्रिक, आर्थिक, सामाजिकदृष्ट्या खेड्यांनाच सक्षम करणारा हा उपक्रम असून सौरऊर्जा, “हेल्थ एटीएम’, उपक्रमशीलतेला या स्मार्ट व्हिलेजमध्ये स्थान असेल. त्याचबरोबर अपंगांसाठी “निजबल’, बेरोजगार तरुणांसाठी “युवाग्राम’ या प्रकल्पाबरोबरच “मियावाकी’ पद्धतीने चार जंगले वसवत पर्यावरण रक्षणाचाही विडा त्यांनी उचलला होता. त्या एक संवेदनशील कलाप्रेमी आणि आर्टिस्ट होत्या.
चळवळीचे काम करताना अनेक धाडसी निर्णय घ्यावे लागतात. या निर्णयांचे फलित भविष्यकाळात दिसून येणारे असते. तोपर्यंतचा काळ नेतृत्वासाठी मोठी कसरत असते. फळे धरलेल्या झाडालाच जास्त दगड बसतात. मागील वर्षी दिवाळीत राळेगणसिद्धीला अण्णांच्या भेटीसाठी गेलो असताना त्यांनी एक कानमंत्र दिला होता. त्याची आज राहून राहून आठवण येते. अण्णा म्हणाले, “माझे वय आज 82 वर्षे आहे, संघर्षाचे क्षण अजूनही संपले नाहीत. एक गोष्ट तुम्ही सर्वजण मन लावून ऐका, कुठल्याही क्षेत्रात काम करा, अडथळे येतीलच, वेळप्रसंगी मानहानी होईल; अशा वेळेस एक गोष्ट मनावर कायमची कोरून ठेवली पाहिजे ती म्हणजे अपमान पचवायची ताकद नेहमी जिवंत ठेवली पाहिजे.’ आज अण्णा हजारे यांचे शब्द कानात घुमत आहेत; तर शीतलताईंचा हसरा चेहरा डोळ्यासमोरून जात नाहीये.
समाजमाध्यमे इतकी दुधारी आणि प्रखर झालीत की त्यांची गती, व्याप्ती एखाद्याची प्रतिमा क्षणात मनामनात पोहोचवू शकते. ऐकणाऱ्याचा “ध’ चा “मा’ कसा होतो हे त्यालाही कळत नाही. गेली अनेक दिवस आनंदवन यामुळेच ढवळून निघाले होते. शीतलताई युवा समाजमनांच्या प्रेरक होत्या. गढूळ झालेले पाणी निवळलेच असते. यासाठी ताईंनी थांबायला हवे होते. पण..!
कोणतीही व्यक्ती अनंताच्या प्रवासाला निघून गेली की, तिच्या आप्तेष्टांच्या काळजाला चटका लागतो. परंतु डॉ. शीतल यांच्यासारखी प्रेरणादायी बेटे जेव्हा नियती आपल्यापासून हिरावून घेते तेव्हा ती पोकळी भरून निघणे शक्य नसते. आमटे कुटुंबीयांनी आजवर शेकडो जणांच्या आयुष्यात आनंदाचे मळे फुलवले आहेत. कित्येकांना अंधःकारातून प्रकाशाकडे नेले आहे. डॉ. शीतल या वाटचालीतील एक महत्त्वाच्या घटक होत्या. असे असताना मनावरचे ओझे जड झाल्याने त्यांनी जीवनयात्रेचा शेवट करणे हे या बहरलेल्या मळ्यांसाठी आणि त्यांकडे पाहून जगण्याची ऊर्मी घेणाऱ्यांसाठी किती वेदनादायी असेल, हे शब्दांत सांगता येणे शक्य नाही.
हजारो जणांचे आदर्शस्थान जेव्हा ढासळते तेव्हा एखादा वटवृक्ष उन्मळून पडल्यासारखी स्थिती होते. त्या वटवृक्षाच्या खोडा-फांद्यांवरील पक्षी, त्याच्या सावलीने सुखावणारे जन अनाथ झाल्यासारखे होतात. आज तीच स्थिती माझ्यासारख्या अनेकांची झाली आहे.