स्थलांतरित मजुरांचे दुःख जर माध्यमे दाखवीत असतील तर त्यामागील हेतू हा केवळ सरकारवर दोषारोप करणे हा नसून व्यवस्थेत सुधारणा व्हावी हाच असू शकतो, मात्र हे लक्षात न घेता भारताचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी माध्यमांना गिधाडांची उपमा दिली आहे. मात्र माध्यमे आणि पत्रकार हे गिधाड नसून सरकारवर तिक्ष्ण नजर ठेवून सरकारचे पितळ उघडं पाडणारे गरुड आहेत.
करोनाच्या प्रादुर्भावाच्या काळात अनेक परप्रांतीय मजूर स्थलांतरित झाले आणि त्या स्थलांतराच्या दरम्यान अनेक मजुरांच्या नशिबी मृत्यू देखील आला. वाहतूक बंद असल्याने मजूर मिळेल त्या साधनाने आपले गाव गाठू पाहत होते आणि अनेकांनी पायी चालणे पसंत केले. यात कधी रेल्वे रुळावर तर कधी वाहनांच्या अपघातात मजुरांचे मृत्यू झाले. अशा स्थलांतरितांचे दुःख जगासमोर पत्रकारांनी माध्यमांतून मांडले. मात्र यामुळे देशाचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता चांगलेच संतापले.
सर्वोच्च न्यायालयात स्थलांतरित मजुरांच्या विषयीची याचिका आली असताना मेहता यांनी सरकार स्तुत्य काम करीत असताना काही जण मात्र त्या सकारात्मकतेत नकारात्मकता शोधत आहेत आणि एका अर्थाने विपर्यस्त चित्रण करीत आहेत, असा दावा केला. एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर असे करणाऱ्यांची तुलना त्यांनी गिधाडांशी केली. गिधाडे ही मेल्या मांसावर ताव मारतात; एका अर्थाने गिधाडांचे लक्ष कलेवरांवर असते असा मेहता यांचा रोख. मेहता यांनी सरकारची बाजू उचलून धरणे समजू शकते; तथापि याचा अर्थ त्यांनी माध्यमे आणि पत्रकार यांची अशा शेलक्या शब्दात संभावना करावी असा होत नाही.
माध्यमे आणि पत्रकार यांची समाजाचे जागले म्हणून असणारी भूमिका महत्त्वाची आहे. सरकारची तळी उचलून धरणे हे काही माध्यमांचे काम नाही आणि ती त्यांची भूमिका देखील असू शकत नाही. जेव्हा अनेक वर्षे केंद्रात कॉंग्रेस सत्तेत होती तेव्हा देखील माध्यमे आणि वृत्तपत्रे सरकारच्या उणिवा दाखवून देत असत. कारण ती जागल्याची भूमिका वठविणे हेच माध्यमांचे प्रधान कर्तव्य असते. सरकारच्या निर्णयातील फोलपणा दाखविणे असो किंवा सरकारला आरसा दाखविणे असो त्यासाठीच माध्यमांचे प्रयोजन असते नि ते करण्यामागील हेतू चांगले-वाईट अशी विभागणी करणे हा नसून ज्या बाबतीत सरकारकडून अनावधानाने किंवा हेतुपुरस्सर कुचराई होत आहे त्याकडे सरकारचे लक्ष वेधून त्यातून व्यापक हित घडवून आणणे हा असतो.
तेव्हा माध्यमांनी स्थलांतरित मजुरांचे दुःख वेशीवर टांगले तर ती नकारात्मकता आहे, असे मानण्याचे कारण नाही. किंबहुना सरकारने माध्यमांचे आभार मानले पाहिजेत ते यासाठी की त्या दुःखांवर उपाय योजण्याची संधी त्यामुळे सरकारला मिळाली. ते न करता मेहता यांनी माध्यमांना गिधाडांची उपमा दिली आहे हे आक्षेपार्ह आहे. वस्तुतः यापूर्वी माध्यमांनी सत्ताधाऱ्यांना जेव्हा जहाल प्रश्न विचारले तेव्हा भाजप विरोधी पक्ष होता आणि त्यावेळी तीच माध्यमे भाजपला हवीहवीशी वाटत होती. त्या सरकारविरोधी लाटेचा लाभ देखील भाजपने उठविला. परंतु त्यावेळी ती माध्यमे नकारात्मकता पसरवत आहेत, असे भाजपला वाटले नाही. किंबहुना काही वृत्तपत्रे आणि नियतकालिके कॉंग्रेस सरकारच्या उणिवा हिरीरीने दाखवून देत असत. त्याविषयी प्रत्यवाय असण्याचे कारण नाही. पण मग आता देखील अधिक संयतपणे माध्यमांविषयी उद्गार काढणे गरजेचे आहे.
कॉंग्रेस सत्तेत असताना ज्या माध्यमांनी त्या सरकारचे दोष दाखवून दिले त्या बद्दल मेहता यांना विस्मरण झाले असावे. कित्येकदा माध्यमांनी सरकारचे दोष दाखवून दिले म्हणून व्यवस्थेत सुधारणा देखील झाल्याची उदाहरणे आहेत. सोशल मीडिया हे देखील एक माध्यमच आहे. त्याचा कॉंग्रेस विरोधात वातावरण निर्मितीसाठी भाजपने कसा पद्धतशीर उपयोग करून घेतला हे विसरता कामा नये. मात्र त्यावेळी तो नकारात्मक प्रचार आहे, असा आक्षेप भाजपमधील कोणी घेतला नाही. सोशल मीडिया आणि माध्यमे किंवा वृत्तपत्रे यात फरक असला तरी सरकारच्या विरोधात बोलणे म्हणजेच मूळात नकारात्मकता हे समीकरण ग्राह्य मानले तर सोशल मीडियावर कॉंग्रेस राजवटीवर उडालेला धुरळा हा देखील त्याच वर्गात मोडेल. तसे असेल तर मेहता यांचा हा युक्तिवाद भाजपच्या अनेक समर्थकांना लागू पडणार का आणि मेहता यांची तशी तयारी आहे का हा खरा प्रश्न आहे. तेव्हा भूमिका आणि युक्तिवाद हे सोयीस्कर असले की त्यातील फोलपणा आणि पोकळपणा अधिकच दृगोच्चर होतो. मेहता यांच्या युक्तिवादात एकीकडे हा फोलपणा तर दुसरीकडे असहिष्णुता डोकावते. गिधाडे ही कलेवरांवर पोसली जात असली तरी ती निसर्गाच्या साखळीतील महत्त्वाची कडी आहेत कारण निसर्गातील घाण ती नष्ट करीत असतात.
तेव्हा त्या अर्थाने मेहता यांनी माध्यमे आणि पत्रकारांना गिधाडांची उपमा दिली असेल तर मात्र माध्यमांनी तो आपला सन्मानच समजला पाहिजे आणि मेहता यांनी केलेला युक्तिवाद म्हणजे माध्यमांवर टीका नसून उलट त्यांचे कौतुक आहे असे मानले पाहिजे. मात्र, मेहता यांनी त्या अर्थाने ते विधान केलेले नाही हे उघड आहे; पण इष्ट ते मांडणारी माध्यमे तेच विधान आपला सन्मान म्हणून घेतील यात शंका नाही. शिवाय हा प्रश्न केवळ सकारात्मकता किंवा नकारात्मकता एवढ्यापुरता सीमित नाही. प्रश्न माध्यमांच्या स्वातंत्र्याचा देखील आहे. केवळ सरकारची री ओढायची तर माध्यमांची गरज राहणार नाही. सरकारवर अंकुश ठेवणे गरजेचे असते आणि लोकशाहीचा चौथा स्तंभ हे कर्तव्य बजावत असतो. अशा वेळी माध्यमांची संभावना शेलक्या शब्दात करणे हे संवेदनशीलतेचे लक्षण नव्हे. अर्थात यातून आणखी एक गोष्ट सिद्ध होते आणि ती म्हणजे माध्यमाचे सामर्थ्य. माध्यमांमध्ये सरकारची खरी प्रतिमा जनतेसमोर उघड करण्याचे सामर्थ्य आहे याची अप्रत्यक्ष कबुलीच मेहता यांनी दिली आहे. एरवी माध्यमांनी काय दाखविले याची एवढी धास्ती मेहतांनी घेणे आवश्यक नव्हते. तेव्हा गिधाडांची उपमा ही केवळ शेलकी टीका करण्याच्या भूमिकेतून आलेली नसून ती या धास्तीतून देखील आली आहे हे लक्षात ठेवले पाहिजे.
अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांनीही आपल्याला वृत्तपत्रे उचित वागणूक देत नाहीत अशी तक्रार केली होती. माध्यमे जेव्हा सरकारला धारेवर धरतात तेव्हा सत्ताधाऱ्यांना ते रुचत नाही. मेहता यांची विधाने त्यातूनच आलेली आहेत. मात्र त्यामुळेच उलट माध्यमांची आवश्यकता अधोरेखित होते. माध्यमांनी स्थलांतरित मजुरांची दुःखे दाखविली नसती तर कदाचित मेहता समाधानी झाले असते. पण त्याने त्या मजुरांसाठी अधिक उपाययोजना करण्यास सरकार देखील सरसावले नसते. माध्यमांची हीच तर भूमिका असते- सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवणे आणि मुख्य म्हणजे त्यांना उत्तरदायी बनविणे. मेहतांच्या आदळआपटीमधून माध्यमांनी आपली भूमिका चोख बजावली आहे याचीच अप्रत्यक्ष ग्वाही मिळते!
– राहुल गोखले