राहुल गांधी यांनी स्वतःबद्दल काही वेगळे पैलू आपल्या एका भाषणात मांडले. त्याबाबत…
पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांत दारुण पराभव झाल्यानंतर कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे अर्थातच हताश झाले असणार. जी-23 गटाचे कपिल सिब्बल, गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा प्रभृतींनी कॉंग्रेस नेतृत्वावर हल्लाबोल सुरू केला. त्यानंतर कॉंग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीतही वादळी चर्चा झाली. कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी तप्त वातावरण शांत करण्यासाठी आझाद यांच्याशी चर्चा केली; परंतु राहुल हे शांतच होते. त्यानंतर कर्नाटकातील सिद्धरामय्या आणि शिवकुमार या दोन गटांत तह करण्यासाठी ते त्या राज्यात जाऊन आले.
राजस्थानमधील कॉंग्रेस नेते सचिन पायलट यांनी नवी दिल्लीत येऊन राहुल यांच्याशी चर्चा केली. नजीकच्या भविष्यात, म्हणजे 2023च्या डिसेंबरमध्ये राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुका आहेत. या निवडणुकांत विजय मिळवणे कॉंग्रेसच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे आणि म्हणूनच कॉंग्रेस नेतृत्व पूर्वतयारी म्हणून त्या राज्यातील वेगवेगळ्या नेत्यांना भेटत आहे. 2019च्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसला राजस्थानातील एकही जागा मिळाली नाही. राजस्थानात अशोक गहलोत यांच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेसचे सरकार असूनही, इतके दारुण अपयश यावे, ही धक्कादायक बाब आहे.
2024च्या लोकसभा निवडणुकांत याची पुनरावृत्ती झाल्यास, लोकसभेत कॉंग्रेसचे संख्याबळ चांगलेच घटेल. याचे कारण, अन्य राज्यांतही कॉंग्रेसची दुर्गतीच आहे. राजस्थानमध्ये सचिन पायलट यांना मुख्यमंत्रिपद मिळेल, असे संकेत राहुल यांनी 2018 मध्येच दिले होते. परंतु केवळ हेच नव्हे, तर दिलेली अन्य आश्वासने पूर्ण न झाल्यामुळे सचिन पायलट हे नाराज आहेत. अशोक गहलोत आपली खुर्ची सोडायला तयार नाहीत. त्यांना तेथून हुसकवल्यास पक्षाला आगामी निवडणुकीत फटका बसेल का, याचा अंदाज कॉंग्रेस श्रेष्ठी घेत असावेत.
मध्य प्रदेशातही कॉंग्रेसची असलेली सत्ता गेली आणि कमलनाथ सरकार पाडून शिवराजसिंह चौहान यांच्या नेतृत्वाखालील भाजपचे सरकार आले. मध्य प्रदेशात कॉंग्रेसची ताकद वाढत असल्याचे कोणतेही चिन्ह नाही. चौहान सरकारचा कारभार प्रभावी नसूनही, त्याचा फायदा घेण्यात कॉंग्रेस यशस्वी झालेली नाही. छत्तीसगडमध्येदेखील कॉंग्रेसमध्ये मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्याविरुद्ध टी. एस. सिंगदेव यांचा गट सक्रिय आहे. पंजाबात तर कॉंग्रेसचे पानिपत झाल्यानंतर माजी मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी अदृश्यच आहेत. प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांची हकालपट्टी झाली असून, त्यानंतर मृतप्राय संघटनेत प्राण कोण फुंकणार, हाच प्रश्न आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर, राहुल गांधी यांनी नुकतीच ज्येष्ठ समाजवादी नेते शरद यादव यांची नवी दिल्लीत भेट घेतली. यादव यांनी
स्वतःचा पक्ष विसर्जित केला असून, ते लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलात सामील झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या विरोधात असलेल्या सर्व शक्तींनी एकत्र आले पाहिजे, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. मात्र शरद यादव यांचे राजकारण संपुष्टात आले असून, सदिच्छा भेट घेणे वेगळे आणि अशा नेत्यांबाबत फार आशा बाळगणे वेगळे. संपलेले नेते आणि चिल्लर छोटे मोठे पक्ष एकत्र आणून उपयोगाचे नाही. मोदी, भाजप आणि संघ यांना विरोध हा काही कार्यक्रम होऊ शकत नाही. आम्हाला “ते’ नको आहे, हे सांगणे ठीक आहे. पण काय हवे, तेही सांगायला पाहिजे.
नवी दिल्लीत पार पडलेल्या एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यात भाषण करताना, राहुल गांधी यांनी काही विषयांवर मनमोकळेपणाने मते व्यक्त केली. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांसाठी कॉंग्रेस व बहुजन समाज पार्टीने एकत्रितरीत्या लढावे. मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार म्हणून मायावती असतील, असा प्रस्ताव आम्ही त्यांना दिला होता. परंतु मायावती यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. कदाचित मायावती दबावाखाली असाव्यात. सीबीआय, ईडी, पेगॅसस यांचे त्यांच्यावर दडपण होते, असे मत राहुल यांनी व्यक्त केले. या विधानसभा निवडणुका मायावती यांनी मनापासून लढवल्या नाहीत आणि त्याचा भाजपला स्पष्टपणे फायदा झाला, हे उघडच आहे; परंतु बसपाचे काय व्हायचे ते होवो. कॉंग्रेसने, आपल्या पायाखाली काय जळते आहे, याचा विचार केला पाहिजे.
बसपला कांशीराम यांनी सुरू केलेली लढाई सुरू ठेवायची नसेल, दलितांच्या हक्कासाठी झुंजायचे नसेल, तर मग त्यासाठी पुढे येण्यास कॉंग्रेसला कोण रोकले आहे? मात्र, या प्रकाशन सोहळ्यात बोलताना राहुल गांधी यांनी आपले व्यक्तिमत्त्व कसे आहे, याबद्दल स्वतःच काही गोष्टी सांगितल्या. ते म्हणाले, “तुम्हाला ऐकायला विचित्र वाटेल. पण ज्या घरात अनेक वर्षे सत्ता होती अशा घरात मी जन्म घेतला. पण मला सत्तेत रस नाही. मी माझ्या देशावर प्रेम करतो. देश ने सिर्फ मुझे प्यार नहीं दिया, देश ने जूते भी मारे.
सकाळपासून रात्रीपर्यंत मी हा देश, या देशातले लोक जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो.’ राहुल यांच्या या भाषणामधून त्यांचे वेगळेपण अधोरेखित होते. आपल्या पित्याच्या खुन्यांबद्दलही त्यांना द्वेष वाटत नाही. गुजरातमधील उना येथे 2016 मध्ये दलित तरुणांना जबरदस्त मारहाण झाली होती. त्यावेळी राहुल संबंधित दलित कुटुंबीयांना भेटण्यासाठी गेले होते. उना येथील घटनेचा व्हिडिओ बघून अनेक दलित तरुणांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता, अशी माहिती एका पीडित दलित तरुणाच्या पित्याने दिली. या घटनेचा आपल्या मनावर खोल परिणाम झाल्याचे राहुल यांनी सांगितले.
या देशातील अगणित दलित, आदिवासी, शेतमजूर आणि गोरगरीब स्त्रिया यांच्याबद्दल राहुल गांधी यांच्या मनात करुणा आणि आस्था आहे. सामाजिक संवेदना जागृत असणे आणि देशातील सर्वच वर्गाबद्दल प्रचंड आत्मियता असणे, ही इंदिरा गांधी यांच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये होती. तेच गुण राहुल यांच्यात आहेत. परंतु निवडणुकीची गणिते, त्यासाठीची व्यूहरचना आणि आधुनिक राजकारणात लागणारी चलाखी आणि सत्ताप्रेम ही कॉंग्रेसजनांची वैशिष्ट्ये सर्वपरिचित आहेत. परंतु राहुल मात्र कॉंग्रेसमध्ये असूनही ते कॉंग्रेसमन वाटत नाहीत!
हेमंत देसाई