श्रीरामपूर, (प्रतिनिधी)- शिर्डी लोकसभा मतदारसंघातून रिपब्लिकन पक्षाचे नेते तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनाच उमेदवारी द्यावी, अन्यथा आम्ही आरपीआयचे कार्यकर्ते भाजपच्या उमेदवाराचा प्रचार करणार नाही. तसेच शिर्डीसह डॉ. सुजय विखे पाटील यांच्या विरोधात दक्षिणेतूनही रिपब्लिकन पक्षाचा अपक्ष उमेदवार देऊ, असा इशारा रिपब्लिकन पक्षाचे विजयराव वाकचौरे यांनी पत्रकार परिषदेत दिला.
यावेळी राजाभाऊ कापसे, दीपकगायकवाड, संगमनेचे आशिष शेळके, भीमराज बागुल, सुनिल शिरसाठ, सुभाष त्रिभुवन, आबासाहेब रणनवरे, राजाभाऊ मगर, अनिल रणनवरे, रमादेवी धिवर, अमित काळे, आंतोन शेळके, संजय बोर्गे, विजय पवार, विशाल सुरडकर, मनोज काळे, श्रीमती सांगळे आदी उपस्थित होते. वाकचौरे म्हणाले, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची बैठक झाल्यानंतर पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.
यावेळी ते बोलत होते. या लोकसभा निवडणुकीत आमच्या पक्षाला राज्यातील सोलापूर व शिर्डी या केवळ दोन जागा मिळाव्यात म्हणून भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांकडे मागणी केली होती. त्यापैकी आम्ही शिर्डीची जागा आमचे नेते रामदास आठवले यांच्यासाठी सोडावी, अशी मागणी केली आहे. आठवले यांना मागीलसारखे राज्यसभा व मंत्रीपद देऊन शांत करणार असेल तर ते आम्ही खपवून घेणार नाही. आम्ही भाजपाबरोबर 2009 पासून काम करत आहोत. 2014 मध्येही आम्ही प्रचार केला.
आमचे केंद्रात, राज्यात भलेही आमदार, खासदार नसतील मात्र आमच्या पक्षाच्या जोरावरच त्यांना सत्ता स्थापन करता आली. त्यामुळे भाजपने त्यांना राज्यसभेवर घेऊन मंत्रीपद दिले. यावेळी भाजपने आम्ही मागणी केलेले दोन लोकसभा मतदारसंघ व शिर्डीतून रामदास आठवले यांना सन्मानपूर्वक उमेदवारी द्यावी, अशी मागणी केली.
जर सन्मानपूर्वक आम्हाला आमची उमेदवारी मिळाली नाही तर आम्ही भाजपाविरुध्द प्रचार करून या दोन्ही मतदारसंघात अपक्ष उमेदवार देऊ, असा इशारा गायकवाड यांनी दिला. सद्याच्या खासदाराबाबत संपूर्ण मतदारसंघात नाराजी पसरली आहे.