मुंबई – दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी राज्याचे मंत्री शंभूराज देसाई यांची भेट घेतली. पार्थ पवारांनी शंभूराज देसाईंची भेट का घेतली? याचं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. तसेच काही खासगी कामासाठी ही भेट असल्याचं पार्थ पवार यांनी सांगितलं असलं तरी, या भेटीनंतर सर्वत्र राजकीय चर्चेला उधाण आलं आहे. यावरून राज्यात घमासान सुरू झाले आहे.
शंभूराज देसाई आणि पार्थ पवार यांच्यात देसाई यांचा शासकीय बंगला असलेल्या पावनगड येथे 15 ते 20 मिनिटं चर्चा झाल्याची बोललं जात आहे. दरम्यान, आता या भेटीवर स्वतः पार्थ पवार यांचे वडील अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी अजित पवार माध्यमांशी बोलत होते.
अजित पवार म्हणाले, “मी मंत्री असताना अनेक राजकीय नेत्यांशी भेटत होतो, अशा अनौपचारिक बैठकीमध्ये विकास कामांबाबत चर्चाही केली जाते. आमची विचारधारा वेगवेगळी असली तरी राजकीय शत्रुत्तव नाही. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि जेष्ठ नेते शरद पवार एकमेकांबद्दल टीकात्मक भाषण करायचे, पण एकत्र भेटल्यावर मैत्रीपूर्ण बोलायचे आणि हीच महाराष्ट्राची संस्कृती आहे”. असं अजित पवार यावेळी म्हणाले.
गोपीचंद पडळकरांनी सांगितलं भेटीमागचं कारण…
“पार्थ पवारांनी मंत्री देसाईंची भेट कशासाठी घेतली हे माहिती नाही. पण, पार्थ पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अस्वस्थ आहेत कारण, त्यांचे बंधू रोहित पवार हे दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन विधानसभा सदस्य झाले. ते आता क्रिकेट असोसिएशनचे देखील अध्यक्ष झाले असून, बारामती अॅग्रो सारखी संस्था ही त्यांच्याकडं आहे. त्यामुळं त्यांच्या मनात खंत असेल.’
‘पार्थ पवार यांचा मावळ लोकसभेत अडीच लाखांच्या मतांनी पराभव झाला होता. त्यामुळे राजकीय स्थिरता मिळवण्यासाठी ते प्रयत्न करत असतील. घरात आजोबांकडून अन्यात होत असल्याने, न्याय मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.’ असा टोला पडळकर यांनी लगावला आहे.