भोपाळ – हिंदू धर्माची शिकवण जगाला देण्याची गरज असल्याचे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केले. मात्र यासाठी कुणाचाही धर्म बदलवण्याची गरज नाही असेही त्यांनी यावेळी नमूद केले. पण असे जरी असले तरी आपल्या लोकांचाही धर्म बदलला जाउ नये, असा सूचक इशाराही त्यांनी दिला. ते छत्तीसगडमधील मुंगेली जिल्ह्यात मदकू बेटावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
भागवत म्हणाले, भारतीय समाजात खूप विविधता आहे. येथे अनेक देवी-देवता आहेत. असे असले तरी प्रत्येकाला सोबत घेऊन वाटचाल केली पाहिजे. हीच प्रक्रिया मागील अनेक शतकांपासून सुरू आहे. हिंदू धर्माची शिकवण कुणाचे धर्म परिवर्तन करण्याचा प्रयत्न न करता जगाला देण्याची गरज आहे. भारतातील हिंदू धर्म सत्य आहे आणि आपल्या देशाने हा सत्याचा मार्ग जगाला दाखवला पाहिजे.
कलियुगात जे कमकुवत आहेत केवळ त्यांचंच शोषण होतं. स्वामी विवेकानंद यांनी देखील कमकुवतपणा हा शाप असल्याचे म्हटले होते. शक्ती म्हणजे संघटीतपणे जगणे आहे. एकटा व्यक्ती कधीच शक्तीशाली असू शकत नाही. कलयुगात संघटन हीच शक्ती आहे. आपल्याला प्रत्येकाला एकत्रित आणले पाहिजे. त्यासाठी त्यांना बदलवण्याची गरज नाही,असे मोहन भागवत यांनी सांगितले.