सोलापूर – कर्नाटकात सध्या पाण्याचे दुर्भिक्ष झाले आहे. त्यामुळे तहानलेल्या कर्नाटक राज्याने महाराष्ट्राकडे पाण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्राने वारणा, कोयना नद्यांतून तसेच उजनीच्या जलाशयातून तहानलेल्या कर्नाटकसाठी पाणी सोडावे, अशी विनंती कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बुधवारी(दि.31मे) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून केली आहे.
कर्नाटक सरकारने महाराष्ट्राला पाणी देण्याची विनंती केली आहे. यावर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांसमोर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले की, उन्हाळ्यात नेहमी दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण होत असते. आपल्याकडून पाणी गेल्याशिवाय कर्नाटकमधील सुरुवातीच्या लोकसंख्येला पाणी मिळत नाही. त्यामुळे जोपर्यंत पाऊस होत नाही तोपर्यंत दोन-अडीच महिने जिकीरीचे जाऊ शकतात, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली.
पुढे पाटील म्हणाले की, महाराष्ट्र सरकारकडून तिथल्या लोकसंख्येला पिण्याच्या पाण्यासाठी नकार कोणीही देत नाही. कर्नाटक सरकारने महाराष्ट्राकडे पाण्याची मागणी केली असेल तर राज्यातील शिल्लक पाणीसाठा पाहून, महाराष्ट्रातील लोकसंख्येची पाण्याची आवश्यकता पाहून राज्य सरकार निर्णय घेईल, असे ते म्हणाले.