आळंदी देवाची, पुणे – संत ज्ञानेश्वर महाराज यांचा आषाढी वारी पालखी प्रस्थान सोहळा अवघ्या 10 दिवसांवर आला आहे. येत्या 11 जूनला पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. पालखी प्रस्थानासाठी लाखो भाविक हे आळंदीला येत असतात. या लाखो भाविकांची स्नानाची व्यवस्था ही इंद्रायणी नदीत होत असते.
मात्र सध्या आळंदीची इंद्रायणी नदी प्रचंड प्रदुषित झालेली आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील कंपन्यांचे केमिकल मिश्रित पाणी तसेच शहरातील काही भागातील पाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट इंद्रायणी नदीत सोडण्यात आले आहे. परिणामी इंद्रायणीचे पाणी प्रचंड प्रदुषित झाले असून पाण्यावर मोठा फेस तयार झालेला आहे. तसेच पाण्याची दुर्गंधी येत आहे.
प्रस्थान सोहळ्याला आलेल्या लाखो वारकऱ्यांची स्नानाची व्यवस्था इतर ठिकाणी होणे कठिण असते. इंद्रायणी हाच स्नानासाठी पाण्याचा मोठा स्त्रोत आहे. तसेच आळंदीला आल्यानंतर तीर्थक्षेत्री इंद्रायणीत स्नान करण्याचे महत्व असल्याने भाविक श्रद्धेने इंद्रायणीत स्नान करत असतात. काही वारकरी तीर्थ म्हणून हेच पाणी प्राशन करतात. मात्र या पाण्यात स्नान केल्याने वारकऱ्यांना विविध त्वचा रोगांच्या आजारांना सामोरे जावे लागू शकते. याआधीही इंद्रायणीत स्नान केल्याने अनेकांना त्वचारोगाच्या समस्या उद्भवल्याचे दिसून आले आहे.
दरम्यान, महाराष्ट्र सरकारकडून वारकऱ्यांना सर्व सुविधा देण्याची त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याची घोषणा केली जाते. मात्र प्रत्यक्षात ते किती खरे आहे हे आपण या दृश्यांमधून पाहू शकता.. कोणत्याही पक्षाचे सरकार आले तरीही त्यांनी आतापर्यंत इंद्रायणी प्रदुषण मुक्तीसाठी कोणतेही प्रयत्न केलेले नसल्याचे या दृश्यांमधून दिसून येते. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून संबंधित कंपन्यांवर काही कारवाई केली जाते का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.