बॉलीवूड अभिनेत्री स्वरा भास्कर ही कोणत्या ना कोणत्या कारणाने आणि बिनधास्त विचाराने चर्चेत राहते. वीरे दी वेडिंग, अनारकली ऑफ आरा, रांझना यासारख्या चित्रपटात काम केलेल्या स्वराने आपल्या अभिनयातून वेगळी छाप पाडली आहे. जेएनयूसारख्या नामांकित संस्थेत पदवी प्राप्त करणाऱ्या स्वराने पडद्यावर धाडसी भूमिका करण्याचे कौशल्य पार पाडले आहे. गेल्या दशकभरापासून काम करणारी स्वरा ही करियरबाबत म्हणते की, बॉलीवूडने मला खडतर रस्त्यावरून सरळ चालण्यास शिकवले. जेव्हा मी बॉलीवूडमध्ये आली तेव्हा कोणीही ओळखत नव्हते.
कोणताही संपर्क नव्हता आणि कनेक्शनही नव्हते. केवळ लेखक अंजुम राजाबली यांच्या कार्यालयात काम करत होते. कोणताही गॉडफादर नसताना मी इथपर्यंत पोचले आहे. सुरवातीच्या काळात अनेक चांगल्या चित्रपटात लहानसहान भूमिका मिळाल्या. मात्र 2013 च्या रांझनाने मला ओळख मिळाली. खऱ्या अर्थाने हा चित्रपट स्वरासाठी मैलाचा दगड ठरला आहे.
रांझना रिलीज होण्यापूर्वी स्वरा ही स्वत:ला एक प्रश्न विचारायची. आपण गाशा गुंडाळून दिल्लीला परतावे का? असे तिला वाटायचे. मात्र नशिबाने तिला चांगले काम मिळाले, चांगल्या लोकांचा संपर्क आला आणि बॉलीवूडमधील वाटचाल सुरू झाली. एक कलाकार म्हणून अभिनयाला संपूर्ण वाव मिळावा अशाच स्क्रिप्टची मी निवड करते, असे स्वरा म्हणते.
यावर्षीच्या प्रारंभी स्वराने भाऊ इशानसमवेत स्वत:चे प्रॉडक्शन हाऊस लॉंच केले. या प्रॉडक्शन हाऊसची पहिली निर्मिती म्हणजे कृष्णा सेनवरचा बायोपिक. हा चित्रपट उत्तराखंडमध्ये राहणारी महिला कृष्णा सेन यांच्यावर बेतलेला आहे. ही महिला स्वत:ला पुरुष असल्याचे सांगून दोन महिलांशी विवाह करून फसवणूक करते. स्वराने या चित्रपटाबाबत फारसे काही सांगितले नाही. मात्र पटकथेवर काम सुरू असल्याचे सांगितले जात आहे.