मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नामनियुक्त विधान परिषद सदस्यतेबाबत राज्यपालांना जो निर्णय घ्यायचा आहे तो घेऊ द्या. पण घटना आणि कायद्याची चौकट कोणालाच मोडता येणार नाही. राजभवनाच्या भिंतीवर कितीही डोके फोडले तरी २७ मे नंतरही सरकार हेच राहील आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच राहतील. हे वैभल्यग्रस्त विरोधी पक्षाने लक्षात ठेवावे, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपला खडसावले आहे. शिवसेनेचे मुखपत्र सामनातील रोखठोक या लेखातून त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
महाराष्ट्रातील विरोधी पक्षाने ताळतंत्र सोडला आहे. राज्य संकटात असताना येथे अराजकाची आग लागावी अशी त्यांची इच्छा आहे. याकामी विरोधी पक्ष राज्यपाल या संस्थेला बदनाम करीत आहे, असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे पूर्वाश्रमीचे भाजपचे नेते आणि संघ प्रचारक आहेत. पण आज ते फक्त राज्यपाल आहेत. विरोधी पक्षाचे नेते राजभवनात उठसूठ जातात आणि राज्यपाल हे फक्त भाजपचेच नेते आहेत अशा आविर्भावात भेटतात. त्यामुळे राज्यपालांची प्रतिमा खराब होत आहे, असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.
तसंच, राज्याच्या प्रश्नांबाबत विरोधी पक्षनेत्यांनी मुख्यमंत्र्याना भेटून त्यांचे मन मोकळे केले पाहिजे किंवा तक्रारी मांडल्या पाहिजेत. मात्र त्या राज्यपालांनाच सतत सांगणे, राज्यपालांच्या कानाशी लागणे कितपत योग्य आहे? असा सवाल त्यांनी केला आहे.
आता विरोधी पक्षनेते राजभवनाचा परिसर सोडायला तयार नाहीत. राजभवनातील एखादे कॉटेज आता विरोधी पक्ष नेत्याचे अधिकृत निवासस्थान म्हणून जाहीर केले की झाले? विरोधी पक्ष स्वत:बरोबर राज्यपालांचे अध:पतन करीत आहे. राज्यपालांनी ते रोखावे, असे संजय राऊत यांनी सांगितले.