पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – मेट्रो स्थानकांच्या नावावरून राजकीय पक्षांकडून सुरू करण्यात आलेला वाद निरर्थक असून या वरून वाद निर्माण करू नये, असे आवाहन माजी महापौर संघटनेने व्यक्त केले आहे. शहरात मेट्रोची सेवा सुरू झाल्यानंतर महामेट्रोने स्थानकांना देण्यात आलेल्या नावांवरून वाद सुरू झाले आहेत.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने स्वारगेट ते सिव्हील कोर्ट या मेट्रोच्या भुयारी मार्गवरील बुधवार पेठ स्थानकाचे नाव बदलून कसबा पेठ स्थानक देण्यात यावे या मागणीसाठी स्थानक परिसरात आंदोलन केले. यावरून इतरही स्थानकांच्या नावावरून वाद निर्माण झाले असून हे वाद निरर्थक असल्याच्या भावना माजी महापौरांनी व्यक्त केल्या असल्याचे संघटनेच्या अध्यक्षा राजलक्ष्मी भोसले आणि सचिव अंकुश काकडे यांनी सांगितले.
मेट्रोनेही विचार करून नाव द्यावे : स्थानकांना नाव देताना मेट्रोनेही स्थानिक परिसराचा विचार करावा, अशी सूचना माजी महापौरांनी या पत्रात केल्या आहेत. त्यानुसार, पुण्यातील प्रत्येक पेठेला काहीतरी संदर्भ आहे. एखाद्या पेठेत काहीतरी चुकीचे होते, म्हणून ती संपूर्ण पेठ वाईट असे म्हणणे योग्य नाही. हा वाद निरर्थक आहे.
मेट्रोने कुठल्याही पेठेची नावे न देता तेथील ऐतिहासिक स्थळाचे नांव देण्यात यावे. बुधवार की कसबा हा वाद मिटवण्यासाठी त्या स्टेशनला शनिवार वाडा हे नाव देण्यात यावे. मंगळवार पेठ ऐवजी ‘एस.एस.पी.एम.एस’ ही शिक्षण संस्था स्टेशनजवळ आहे तेव्हा ते नांव देण्यात यावे. या पुढील स्टेशनला नाव देताना तेथील परिसराचा विचार करून नाव द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.