शिरवळ – शिरवळ, ता. खंडाळा येथील सरपंच लक्ष्मी पानसरे यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्तावावर चर्चा व मतदान घेण्यासाठी उद्या, दि. 18 रोजी सकाळी 10 वाजता गावात विशेष ग्रामसभा होणार आहे. या ग्रामसभेची तयारी पूर्ण झाल्याची माहिती खंडाळ्याचे तहसीलदार दशरथ काळे यांनी दिली.
सौ. पानसरे यांच्याविरुद्ध करण्यात आलेला अविश्वास ठराव दि. 16 डिसेंबर 2019 रोजी मंजूर करण्यात आला होता. त्यावर सौ. पानसरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल केलेले अपीलही फेटाळण्यात आले होते. सौ. पानसरे या थेट जनतेतून सरपंचपदी निवडून आल्या असून त्यावेळच्या भाजप सरकारने केलेल्या तरतुदीनुसार या अविश्वास प्रस्तावाला ग्रामसभेची मंजुरी मिळणे आवश्यक आहे.
त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये ही ग्रामसभा होत असून त्यासाठी तहसीलदार काळे यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. ही विशेष ग्रामसभा उद्या, दि. 18 रोजी सकाळी 10 वाजता ज्ञानसंवर्धिनी विद्यालयात होणार आहे. या ग्रामसभेत सकाळी दहा ते चार वाजेपर्यंत गुप्त मतदान होणार असून त्यासाठी चौदा मतदान केंद्रे करण्यात आली आहे. गावातील मतदारांची एकूण संख्या 11 हजार 757 आहे.
मतदान केंद्रांवर मतदारांच्या साहाय्यासाठी 14 कर्मचाऱ्यांची तर मतदानासाठी 56 अधिकारी, कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. मतदान झाल्यानंतर त्याच ठिकाणी मतमोजणी होणार आहे. मतदान केंद्रांकरिता तीन क्षेत्रीय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. मतदान प्रक्रियेत कोविड19 बाबत शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचना व निर्देशांचे पालन करण्यात येणार आहे. मतदारांच्या आरोग्य तपासणीसाठी आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली
ही विशेष ग्रामसभा स्थगित करण्याची मागणी करणारी याचिका सरपंच सौ. लक्ष्मी पानसरे यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. महाविकास आघाडीकडून ऍड. प्रदीप गोळे, ऍड. अजित केंजळे व सरकारी वकील श्रीमती बने यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने ही याचिका फेटाळली.