सातारा – करोनाच्या संकटात शेतकऱ्यांना आधार देण्याचे काम जिल्हा परिषदेकडून होत असताना महावितरणकडून मात्र शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचे प्रकार होत आहेत. अनेकदा तक्रारी करुनही विद्युत ट्रान्सफार्मरची दुरुस्ती होत नाही. प्रत्येक सभेत सदस्य महावितरणबाबत प्रश्न मांडतात. दरवेळी नवीन अधिकारी येत असल्याने सदस्याचे प्रश्न सुटत नाहीत. हा प्रकार गंभीर असून महावितरणने सुधारणा करावी, अशा संतप्त प्रतिक्रिया जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीच्या सभेत सदस्यांनी व्यक्त केल्या. याबाबत महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत लवकरच बैठक घेण्यात येणार असल्याचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते यांनी सांगितले.
समितीची सभा उपाध्यक्ष प्रदीप विधाते यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीस शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे, कृषी सभापती मंगेश धुमाळ, महिला व बालकल्याण सभापती सौ. सोनाली पोळ, समाजकल्याण सभापती सौ. कल्पना खाडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव, किरण सायमोते आदी उपस्थित होते. प्रारंभी विविध विषयांचा आढावा घेण्यात आला. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी सुरु असणारी कामे गतीने करण्याच्या सूचना यावेळी करण्यात आल्या.
ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता असल्याने धोरणात्मक निर्णय घेण्यात येणार नसल्याचे सभेच्या सुरुवातीस सांगण्यात आले. जलव्यवस्थापन सभेत प्रत्येक वेळी पदाधिकारी, सदस्य महावितरणबाबत अनेक प्रश्न मांडतात. मात्र या प्रश्नांची सोडवणूक होत नसल्याची तक्रार मंगेश धुमाळ यांनी केली. याबाबत सदस्यांमध्ये नाराजीचा सूर असून महावितरण शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप धुमाळ यांनी केला.
शेतकरी अडचणीत असताना त्यांना अधिक त्रास देणे उचित ठरणार नसून महावितरणने सामंजस्याची भूमिका घ्यावी, असे धुमाळ यांनी सांगितले. याबाबत लवकरच महावितरणचे अधिकारी आणि संबंधितांची बैठक घेण्यात येईल, असे विधाते यांनी सांगितले. राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत सदस्यांना विश्वासात घेतले जात नसल्याची तक्रारी काही सदस्यांनी केली. योजना राबवत असताना पदाधिकारी, सदस्यांना विश्वासात घेतले तर योजनांची अंमलबजावणी आणखी गतीने होणार असल्याने याबाबत संबधितांना सूचना करण्यात येतील, असे विधाते यांनी सांगितले.
पाणीटंचाईचा आराखडा तयार करण्याच्या सूचना
जिल्ह्यात सद्य परिस्थितीत पाण्याची टंचाई नसली तरी आगामी काळात कुठेही पाण्याची टंचाई भासू नये, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. पाणी टंचाईचा आराखडा तयार करुन त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना उपाध्यक्ष प्रदीप विधाते यांनी यावेळी केल्या. “जलजीवन मिशन’अंतर्गत प्रत्येक कुटुंबास नळ कनेक्शन देण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले.