वॉशिंग्टन – जागतिक बॅंकेचे प्रमुख डेव्हीड मालपास यांच्याशी आज भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी विविध आर्थिक प्रश्नांवर चर्चा केली. जागतिक बॅंकेच्या मुख्यालयात झालेल्या या चर्चेत कोविडच्या विरोधातील जागतिक लढाई, त्याचे अर्थकारणावर झालेले विपरीत परिणाम, आगामी वातावरण बदलाची परिषद अदि मुद्द्यांच्या अनुषंगाने ही चर्चा झाली.
अर्थकारणाची रिकव्हरी, जागतिक बॅंकेकडून भारताला मिळणारे अर्थ सहाय्य, नॉलेज पार्टनरशिप हे मुद्देही या चर्चेत होते. कोविडनंतरच्या अर्थकारणाला चालना देण्यासाठी भारत सरकारने केलेल्या विविध आर्थिक उपाययोजनांचीहीं माहिती निर्मला सीतारामन यांनी मालपास यांना दिली. कार्बन इमिशन रोखण्यासाठी सध्या विविध प्रयोग सुरू आहेत.
प्रयोगशाळेतील हे तंत्रज्ञान आता प्रत्यक्ष मैदानात वापरासाठी आणले गेले पाहिजेत आणि कार्बन उत्सर्जन कमी केले पाहिजे अशी अपेक्षाहीं त्यांनी यावेळी व्यक्त केली. तत्पुर्वी जागतिक बॅंकेच्या विकास समितीच्या सदस्यांपुढेही सीतारामन यांचे भाषण झाले. यावेळीही त्यांनी भारताने कोविडचा सामना करण्यासाठी केलेली उपाययोजना आणि अर्थकारणाला गती देण्यासाठी योजलेले उपाय यांची माहिती दिली.