हिमांशू
निर्भया… म्हणजे निर्भय स्त्री. हा केवळ एक शब्दच राहिला आहे की काय? त्याचा अर्थ कुठे गेला? हा शब्द सुमारे सात-आठ वर्षांपूर्वी आपण प्रथम ऐकला आणि ज्या संदर्भाने ऐकला, त्याच संदर्भाने आजही ऐकतो आहोत. त्यावेळी पेटलेल्या मेणबत्त्यांच्या मशाली होतील आणि देशभरातला काळोख दूर करतील, असं आपल्याला वाटलं होतं. पण अंधार वाढतच चाललाय… आणि निर्भयांची संख्याही! निर्भया दिल्लीतून उन्नावमध्ये, तिथून हैदराबादेत, तिथून हिंगणघाटमध्ये फक्त स्थलांतरित होत राहिली आणि आपण फक्त संख्या मोजत राहिलो. मेणबत्त्या वितळून गेल्या तरी मशाली पेटल्याच नाहीत. खरं तर त्या मेणबत्त्या किंवा मशाली एव्हाना आपल्या आत चेतायला हव्या होत्या. कारण आपल्या आतच सर्वाधिक काळोख आहे. ज्या घरात मुलगी आहे, त्या घरातले लोक ती घराबाहेर पडेल तेव्हा तिला “निर्भया’ म्हणू शकले पाहिजेत. हाच या शब्दाचा खरा अर्थ आहे; किंबहुना असायला हवा.
आज कोणतं घर, कोणती गल्ली, कोणता रस्ता, कोणतं कार्यालय, कोणतं वाहन तिच्यासाठी सुरक्षित राहिलंय? घरातून बाहेर पडलेल्या आपल्या लेकींच्या सुरक्षिततेबद्दल कोणता दावा आपण आज छातीठोकपणे करू शकतो? नराधम, सैतान, हैवान वगैरे शब्दही संपत चाललेत; पण ते ज्यांच्यासाठी वापरले जाताहेत त्यांची संख्या मात्र वाढतच चाललीय. ही आग आपल्या घरापर्यंत येण्याची आपण वाट पाहतोय का?
“ज्याचं जळतं, त्यालाच कळतं’ ही झाली म्हण! परंतु ज्याचं जळतं त्याला काय वेदना होतात याचा अप्रत्यक्ष अनुभव घेण्याची आपली क्षमता कुठे गेली? हिंगणघाटच्या मुलीनं सुमारे आठवडाभर संघर्ष करून अखेर मृत्यूपुढं शरणागती पत्करली. या आठवडाभरात तिला आणि तिच्या कुटुंबीयांना एकेक क्षण किती मोठा वाटला असेल, याची अनुभूती घेण्याइतके संवेदनशील राहिलोय का आपण?
कुठलातरी एक पोरगा नोकरीवर निघालेल्या एका मुलीच्या अंगावर पेट्रोल फेकतो आणि भरचौकात तिला पेटवतो, ही घटना आपल्याला हादरवून सोडते; पण विचाराला प्रवृत्त करते का? वास्तविक ती मुलगी आणि तो मुलगाही आपल्यासारख्याच एखाद्या घरातले असतात. आपल्या मुलांनी परीक्षेत किती मार्क मिळवायला हवेत, हे जर आपण मुलांना सांगू शकतो, त्यांच्यावर दबाव आणू शकतो तर याच बाबतीत आपण मागे का आहोत? पालकांच्या अपेक्षांच्या ओझ्यामुळे परीक्षेपूर्वी आणि नंतर आत्महत्या करणाऱ्या मुलांची संख्या या देशात एका वर्षात दहा हजारांवर पोहोचली आहे. मग आपल्याबरोबर शिकणाऱ्या, राहणाऱ्या, वावरणाऱ्या मुलींचा आदर मुलांनी करायलाच हवा, त्यांना मुक्त वातावरण द्यायलाच हवे, या अपेक्षांचे ओझं मुलांवर का नाही? आपण फक्त शर्यतीतले धावपटू तयार करतोय का?
हिंगणघाटच्या मुलीचा मृत्यू झाला, त्याच दिवशी पुण्यात ऍसिड फेकण्याची धमकी देऊन एकानं अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची बातमी आली. नाशिकमध्ये एका महिलेनं पोलीस स्टेशनसमोर स्वतःला पेटवून घेतलं. पिंपरीत एका महिलेनं बाल्कनीतून उडी घेऊन जीव दिला. तिकडे विदर्भात मनाविरुद्ध लग्न करणाऱ्या मुलीच्या आईवडिलांनी आणि भावानं विहिरीत उडी घेतली. दैनंदिन जीवनात आपणही व्यवस्थेप्रमाणंच “तिचं’ वस्तूकरण करतोय आणि म्हणूनच निर्भयांची फक्त संख्या मोजावी लागतेय, हेच रोकडं वास्तव आहे.