दिल्ली हायकोर्टाच्या निकालाला केंद्र, दिल्ली सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात आव्हान
नवी दिल्ली : निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही दोषींना एकत्रच फाशी दिले जावे. असे निर्देश दिल्ली उच्च न्यायालयाने दिले आहेत. या दोषींना ठोठावण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेच्या अंमलबजावणीला सत्र न्यायालयाने दिलेली स्थगिती उठवावी, अशा मागणीसाठी केंद्र सरकारने दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. या दोषींनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली आव्हान याचिका 2017 मध्ये फेटाळल्यानंतर त्यांच्या फाशी संदर्भातील “डेथ वॉरंट’ बजावण्यात दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही उच्च न्यायालयाने ताशेरे ओढले.
दिल्ली सरकारने या चारही दोषींच्या फाशीसाठी 18 डिसेंबर 2019 रोजीच “डेथ वॉरंट’ची मागणी केली होती. सर्व दोषींनी त्यांना उपलब्ध असलेल्या सर्व पर्यायांचा वपर सात दिवसात करावा, त्यानंतर कायद्याप्रमाणे कारवाई केली जाईल, अशी सूचनाही न्या. सुरेश कुमार कैत यांनी चारही दोषींना केली. या दोषींनी कायद्याच्या अंमलबजावणीत दिरंगाई केल्याचा दावा न्यायालयाने फेटाळला.
दरम्यान फाशीच्या अंमलबजावणीला स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिल्याच्या निर्णयाला केंद्र सरकार आणि दिल्ली सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.
देशभर खळबळ माजवणाऱ्या 2012 मधील निर्भया सामुहिक बलात्कार आणि निर्घृण हत्या प्रकरणातील आरोपींना सर्व कायदेशीर सोपस्कार पूर्ण करण्यासाठी एक आठवड्याची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर त्यांच्या फाशी देण्याची प्रक्रिया सुरू करावी, असे आदेश दिल्ली उच्च न्यायलयाने बुधवारी दिले.
न्या. सुरेशकुमार कैत यांच्या एक सदस्यीय खंडपीठापुढे या याचिकेची सुनावणी झाली. न्या. केैत म्हणाले, या आरोपींच्या फाशीचे डेथ वॉरंट काढण्याची प्रक्रिया आठवड्यानंतर सुरू करावी. दिल्ली कारागृह कायद्यानुसार दयेचा अर्ज फेटाळल्यानंतर आरोपींना 14 दिवसांची मुदत दिली जाते. या चारही आरोपींचे डेथ वॉरंट स्वतंत्र काढण्याची आवश्यकता नाही, असेही या निकालपत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.
या आरोपींना फाशी देण्यास पतियाळा हाऊस न्यायलयाने दिलेली स्थगिती फेटाळण्यासाठी केंद्र सरकार आणि तिहार कारागृह प्रशासनाने दाखल केलेल्या याचिका उच्च न्यायलयाने फेटाळून लावल्या. याबाबत सर्व बाजूंचे म्हणणे ऐकल्यानंतर न्यायालयाने रविवारी निर्णय स्थगित ठेवला होता.
अक्षय ठाकूर, मुकेश सिंग, पवन गुप्ता आणि विनय शर्मा या आरोपींना एक फेब्रुवारीला फाशी देण्यात येणार होती. त्याला पतियाळा कोर्टाने स्थगिती देण्याचे आदेश दिले होते. पॅरामेडिकलची विद्यार्थी असणाऱ्या निर्भयावर धावत्या बसमध्ये सहा नराधमांनी 16 डिसेंबर 2012ला सामुहिक बलात्कार केला होता. अत्यंत पाशवी पध्दतीने तिला मारहाण केली. त्यात तिच्यावर उपचार सुरु असताना सिंगापूर येथील रुग्णालयात तिचा काही दिवसांनी मृत्यू झाला होता.
तिहार कारागृहात या खटल्याची सुनावणी सुरू असताना त्यातील एक आरोपी राम सिंग याने आत्महत्या केली होती. तर एक आरोपी अल्पवयीन असल्याने त्याची निरीक्षण गृहात रवानगी करण्यात आली होती.