पुणे : आकाशवाणी पुणे केंद्रातील प्रादेशिक वृत्त विभाग बंद करण्याचा निर्णय प्रसारभारतीने घेतला आहे. यासंबंधीचा लेखी आदेश केंद्राला देण्यात आला आहे. येत्या १९ जूनपासून पुणे वृत्त विभागामार्फत प्रसारित होणारे आकाशवाणीवरील प्रादेशिक आणि राष्ट्रीय मराठी बातमीपत्र छत्रपती संभाजीनगर वृत्त विभागाकडे सोपवण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे.
आकाशवाणीवरील पुणे प्रादेशिक वृत्त विभागाकडून सकाळी सात वाजून १० मिनिटांनी होणाऱ्या, एफएम वाहिनीवरील सकाळी आठ, १०.५८ आणि ११.५८, तसेच सायंकाळी सहाच्याही बातम्या आता बंद होणार आहेत. त्याचप्रमाणे सकाळी ८.३० वाजता राष्ट्रीय बातम्यांचे प्रसारणही बंद होणार आहे. या बातम्या आता छत्रपती संभाजीनगर केंद्राहून दिल्या जाण्याची शक्यता आहे.
पुण्यातील प्रादेशिक वृत्त विभाग बंद होणार असल्यामुळे या बातम्या तेथे पोचणार कशा, पुण्यातील घडामोडींची दखल छत्रपती संभाजीनगरवरून कशी घेतली जाणार याबाबत सध्या तरी अनिश्चितता आहे. देशात आकाशवाणीच्या पुणे केंद्राला सर्वाधिक श्रोते आहेत. सुमारे २४ लाख श्रोते नियमितपणे कार्यक्रम ऐकतात. पुण्यातील केंद्राची स्थापना १९५३ मध्ये झाली असून, येथून गेल्या ४० वर्षांपासून बातम्या प्रसारित होत होत्या.
आगामी सार्वत्रिक निवडणुकांच्या दृष्टीने आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्त विभागाची बातमीपत्रे महत्त्वाची ठरणार आहेत. परंतु तो बंदच झाला, तर श्रोत्यांचीदेखील मोठी गैरसोय होणार आहे. पुण्यामध्ये वारंवार केंद्रीय मंत्र्यांचे दौरे होत असतात. जी-२० परिषदेसारखे महत्त्वाचे कार्यक्रम सातत्याने होत असतात. त्यांचे वार्ताकन करून ते अन्य वृत्त विभागांना, तसेच दिल्लीला पाठवण्याचे काम पुणे वृत्त विभागाद्वारे केले जाते. या निर्णयानंतर पुण्याच्या महत्त्वाच्या बातम्या कशा पद्धतीने प्रसारित होणार हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
सध्या हा विभाग एक भारतीय माहिती सेवेचा अधिकारी (प्रभारी), एक वृत्तनिवेदक आणि एक हंगामी वृत्तसंपादक याशिवाय हंगामी वार्ताहर इतक्याच मनुष्यबळावर कार्यक्षमपणे सुरू आहे. दिल्ली मुख्यालयाने विविध प्रसंगांच्या अनुषंगाने अतिरिक्त कार्यभार सोपवल्यास तो सांभाळण्यास हा विभाग सक्षम आहे. असे असताना केवळ पूर्णवेळ भारतीय माहिती सेवेचा अधिकारी उपलब्ध नाही म्हणून पुण्यासारख्या महत्त्वाच्या केंद्रावरील प्रादेशिक वृत्त विभागच बंद करणे हे न पटण्यासारखे असल्याचे म्हटले जात आहे.