मुंबई – आमदार अपात्रतेबाबतचा मुद्दा सध्या न्यायालयीन प्रक्रियेमध्ये आहे. मात्र आता अजित दादांचे खच्चीकरण चालले आहे. गोपीचंद पडळकर सारखा सत्ता पक्षातला आमदार त्यांना काय काय बोलतो. मात्र सत्तेसाठी लाचारी करणारे त्यावर कसे उत्तर देतील, असा सवाल विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी उपस्थित केला आहे.
वडेट्टीवार पुढे बोलताना म्हणाले की, सत्तेसाठी लाचारी करणारे टीकेवर उत्तर कसे देतील हे महाराष्ट्र पाहतोय. मात्र ते उत्तर देऊ शकले नाही. यामुळे “अजित पवार (Ajit Pawar) गटात सामील होण्यासाठी आमदारांना ब्लेकमेल करण्यात येत आहेत’, हे रोहित पवार बोलते ते सत्य आहे. दोन दिवसांपूर्चीच भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर वादग्रस्त टीका केली होती. पडळकरांनी अजित पवारांना लबाड लांडग्याचे पिल्लू असे म्हटले होते. यावरून वडेट्टीवार यांनी हा मोठा दावा केला आहे.
वडेट्टीवार पुढे म्हणाले की, आमदार अपात्रतेबाबत अध्यक्ष वेळकाढूपणा करत आहेत. एका विशिष्ट पक्षाचा अध्यक्ष असल्यामुळे सरकार वाचवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे निकाल आल्यानंतरही वेळ काढूपणा होत आहे. निकाल काही लागो, पण तो लवकर झाला पाहिजे. देशाच्या पंतप्रधानांनी त्यांचे स्वप्न पूर्ण केले आहे, लोकांच्या स्वप्नाशी त्यांना काहीही देणे- घेणे नाही. लोकसभेचे नवीन सभागृह बांधले आहे. त्यामध्ये या सरकारला पुढच्या काळात जनता प्रवेश करू देणार नाही, हे त्यांचे शेवटचे अधिवेशन ठरेल.
ओबीसी संघटनांसोबत लवकर बैठक घ्या –
ओबीसींच्या विविध मागण्यांसाठी राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनांकडे विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लक्ष वेधले. गुरुवारी मुख्यमंत्र्यांना फोन करीत आपण मराठा समाजाच्या आंदोलनाला भेट दिली, मग ओबीसींच्या मागण्यांकडे दुर्लक्ष का करता, त्यांची बैठक का घेत नाही, असा प्रश्न उपस्थित करीत ओबीसी संघटनांसोबत लवकरात लवकर बैठक लावण्याची विनंती त्यांनी केली.
तसेच, आगामी काळात पिण्याचे पाणी, चाराटंचाईचा प्रश्न गंभीर होणार आहे. राज्य सरकारने कर्नाटकाप्रमाणे राज्यात दुष्काळ जाहीर करून हेक्टरी 25 हजारांची मदत जाहीर करावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे.