आगरतळा – त्रिपुरामध्ये सत्तेवर असणाऱ्या भाजपमधील असंतोष शिगेला पोहचला आहे. पक्षातील काही नेत्यांनी मुख्यमंत्री बिप्लबकुमार देव यांना पदावरून हटवण्याची मोहीम सुरू केली आहे. पक्षांतर्गत कलह वाढीस लागल्याने भाजपची मोठी गोची झाल्याचे मानले जात आहे.
देव यांच्या कार्यशैलीवर भाजपचे काही नेते आणि विशेषत: आमदार नाराज आहेत. त्यातून आमदारांच्या एका गटाने ऑक्टोबरमध्ये पक्षाध्यक्ष जे.पी.नड्डा यांची भेट घेतली. देव यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारचे कामकाज अयोग्य पद्धतीने सुरू आहे.
सरकारच्या गैरकारभाराचा फटका पुढील काळात भाजपला बसेल, असा इशारा त्या गटाने नड्डा यांच्याबरोबरच्या चर्चेवेळी दिला. त्याची दखल घेऊन भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने त्रिपुरा शाखेतील धुसफूस थांबवण्याच्या उद्देशातून केंद्रीय निरीक्षकांना नुकतेच त्या राज्यात धाडले.
पक्षाच्या निरीक्षकांसमोर अनेक कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री हटाव, भाजप बचाव अशा आशयाच्या घोषणा दिल्या. त्यामुळे देव दबावाखाली आले आहेत. त्यातून त्यांनी पत्रकारांशी बोलताना स्वत:ची भूमिका मांडली. मी 13 डिसेंबरला जाहीर सभा घेणार आहे.
त्यावेळी मी मुख्यमंत्रिपदावर रहावे की नाही याबाबत जनतेची इच्छा जाणून घेईल. जनतेचा कौल विरोधात गेल्यास मी पद सोडण्यात तयार आहे, असे त्यांनी म्हटले. ती भूमिका मांडताना ते व्यथित झाल्याचे दिसले.