पुणे- वारजे माळवाडी येथील स्मिता पाटील विद्यालयात सोमवार दि.०३ जानेवारी २०२२ ते बुधवार दि.१२ जानेवारी २०२२ या कालावधीत ” जिजाऊ ते सावित्री सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा अभियानाचे” आयोजन करण्यात आले. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीने अभियानाची सुरुवात करण्यात आली. या दरम्यान विद्यार्थ्यांसाठी कर्तुत्ववान महिलांच्या जीवन परिचयावर आधारित निबंध स्पर्धा, चित्रकला, वेशभूषा स्पर्धा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. एस. आर. पाटील यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पनेतून घेण्यात आल्या.
स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे आपला सहभाग नोंदविला. १२ जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ व युगपुरुष स्वामी विवेकानंद जयंती दिवशी अभियानाची सांगता करण्यात आली.
यावेळी संस्थापक प्रा. एस. आर. पाटील यांनी “भारतीय राज्यघटनेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे तसेच सामाजिक क्रांतीचे अग्रदूत ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचे प्रतिबिंब ही पाहावयास मिळते” असे प्रतिपादन केले. शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षा संजीवनी पाटील यांनी विद्यार्थ्यांनी स्वतःचे ध्येय साध्य करण्यासाठी स्वामी विवेकानंदांच्या एकाग्रता या गुणाचा अंगीकार केला पाहिजे, असे सांगितले.
या कार्यक्रमास प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक संतोष तनपुरे, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक के. जी. पाटील, प्रणिता देशपांडे, अश्विनी मोहिरे, वैशाली चव्हाण, संतोष बळवंत, नितेश भांड, रवींद्र आटोळे, संतोष घुले, योगेश पवार, अजिनाथ वायसे, संजय मोहोळ, सुगंधा शिगवण, परसराम साळवे इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन के. बी. पाटील यांनी तर आभार नंदिनी उगले यांनी मानले. करोना नियमाच्या सर्व अटींचे पालन करून विद्यालयात महात्म्यांची जयंती साजरी करण्यात आली.