मुंबई – “माझ्यावर हल्ला करण्यासाठी खा. श्रीकांत शिंदे यांनी ठाण्यातील एका गुंडाला सुपारी दिली असून, तो माझ्यावर हल्ला करण्याच्या तयारीत आहे, असा खळबळजनक आरोप संजय राऊत यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस व मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहून केला आहे. राऊतांनी हे पत्र ट्विटसुद्धा केले आहे. ट्विटटमध्ये त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग केले आहे. खा. शिंदे हे मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव आहेत.
राऊत पत्रामध्ये म्हणतात की, “महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर लगेच माझी सुरक्षा व्यवस्था पूर्णपणे हटविण्यात आली. याबाबत मी आधीच आपल्याला कळविले आहे. या काळात सध्याच्या सत्ताधारी पक्षाचे आमदार तसेच त्यांनी पोसलेल्या गुंड टोळ्यांकडून मला धमक्या देण्याचे प्रकार घडले. मी त्याबाबतही आपणास वेळोवेळी कळविले आहे. आजच माझ्याकडे पक्की माहिती आली आहे, की ठाण्यातील एक गुंड राजा ठाकूर यास माझ्यावर हल्ला करण्याची सुपारी खा. श्रीकांत शिंदे यांनी दिली असून लवकरच तो माझ्यावर हल्ला करण्याच्या तयारीत आहे. मी संसद सदस्य, सामनाचा कार्यकारी संपादक, शिवसेना नेता असलो तरी एक जबाबदार नागरिक म्हणून ही माहिती आपणास देत आहे.’
राज्यात कायदा सुव्यवस्था आहे का? – आदित्य
राज्यात कायदा सुव्यवस्था आहे का नाही? असा सवालच आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला आहे. विरोधी पक्षातील आमदारांना धमक्या येताय. तर दुसरीकडे गद्दार आमदारांनी पोलीस ठाण्यात गोळीबार केला तरी त्यांच्यावर काहीच कारवाई करण्यात आली नाही, असेही ठाकरे यांनी म्हटले आहे.
पोलीस संपूर्ण माहिती घेतील – देसाई
शंभूराज देसाई यावेळी म्हणाले की, पोलीस आयुक्तांना सदर पत्र दिले आहे, ते चेक करतील केवळ श्रीकांत शिंदे यांना बदनाम करण्यासाठी हे पत्र संजय राऊत यांनी दिले असावे. तसेच नेहमीप्रमाणे राऊत चर्चेत राहण्यासाठी हे तथ्थहीन पत्र लिहिले असावे. त्यांची सुरक्षा वाढविण्यासाठीही हे खोटे पत्र असू शकते. तरी पोलीस याप्रकरणी संपूर्ण माहिती घेतील, असेही देसाई यांनी म्हटले आहे.