जळगाव – तुमच्या वर काही दडपण असू शकतात, काही आमिष दिले असेल मात्र गद्दार म्हणून तिथे राहायचे असेल, थोडी जर लाज उरली असेल, हिम्मत उरली असेल तर आमदारकीचा राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोरे या… होऊन जाऊद्या महाराष्ट्रात 40 जागांवर, असे म्हणत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटातील आमदार, खासदारांना आव्हान दिले आहे. आदित्य ठाकरे यांची राज्यात शिवसंवाद यात्रा सुरु आहे. या यात्रेनिमित्त आज ते पाचोरा येथे पोहोचले होते. यावेळी त्यांनी जाहीर सभेत हे वक्तव्य केले.
तसेच काही जणांना पश्चाताप वाटत असेल, आम्ही केलं ते चुकीचं केंलं, उद्धव ठाकरेंसोबत गद्दारी करणे चुकीचे होते, चुकलो आम्ही माफ करा आम्हाला असे म्हटले तर, ज्यांना शिवसेनेत परत यायचे आहे त्यांच्यासाठी मातोश्रीचे दरवाजे सदैव खुले राहतील, असेही आदित्य ठाकरे म्हणाले. तसेच महाविकास आघाडीत असताना त्या आमदारांना चांगली मंत्रिपदे होती मात्र आता त्यांना बाबाजीका ठुल्लु मिळाला असा टोलाही त्यांनी लगावला.
– हे सरकार कोसळणारच
आदित्य ठाकरेंनी बंडखोर आमदारांवर निशाणा साधत हे बेकायदेशीर सरकार आहे, हे सरकार कोसळणार अशी ग्वाही दिली आहे. हे सर्व 40 आमदार एक दोन लोकांच्या राक्षसी महत्वाकांक्षे पोटी गेले आहेत, मात्र हिंदुत्वासाठी गेले नाही. उध्दव ठाकरे यांनी राजीनामा दिला तेव्हा बारमध्ये नाचतात त्याप्रमाणे टेबलावर चढून हे गद्दार नाचत होते. ही गद्दारी शिवसेनासोबत नाही, माणुसकी सोबत आहे. मी पुन्हा पुन्हा बोलत नाही पण लोकांना कळायला पाहिजे म्हणून त्यांच्या मतदारसंघात जाऊन बोलणार म्हणजे बोलणारच असे परखडपणे आदित्य ठाकरेंनी सुनावले.