सातारा – राज्य शासनाच्या आदेशानुसार महाराष्ट्रात 30 एप्रिलपर्यंत “वीकएंड लॉकडाऊन’ होणार आहे. त्यानुसार शुक्रवारी रात्री आठ वाजल्यापासून सोमवार, दि. 12 रोजी सकाळी 7 पर्यंत (59 तास) जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
शनिवार व रविवार दोन दिवशी अत्यावश्यक सेवेतील सर्व दुकाने, आस्थापना सुरू राहतील; परंतु लोकांना विनाकारण फिरता येणार नाही. विनाकारण फिरणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन व अनुषंगिक कायद्यांन्वये गुन्हे नोंदवले जातील.
संपूर्ण जिल्ह्यात आज रात्री आठ वाजल्यापासून संचारबंदी लागू करण्यात आली असून लोकांनी कारण असल्याशिवाय बाहेर पडू नये. जिल्ह्यात पीोलसांकडून तपासणी होणार आहे. योग्य कारण असेल, तरच नागरिकांना सोडले जाईल, अन्यथा संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. ही संचारबंदी सोमवारी सकाळी सातपर्यंत लागू असून, नागरिकांनी नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.
शनिवारी व रविवारी संचारबंदीत जिल्ह्यात अत्यावश्यक सेवेतील दुकानदार, रिक्षाचालक, डिलिव्हरी बॉय, कारखान्यांमधील काम करणाऱ्यांना करोनाच्या चाचण्या बंधनकारक करण्यात आल्या आहेत. अत्यावश्यक सेवेतील मालक व कर्मचाऱ्यांनी करोना चाचणी निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र सोबत बाळगणे बंधनकारक आहे. संचारबंदीच्या काळात नागरिकांनी कारण असेल तरच बाहेर पडावे. घरी थांबावे, विनाकारण बाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.