बारामती – वाफगांव (ता. खेड) येथील यशवंतराव होळकर यांचे जन्मस्थान असलेल्या किल्ला संवर्धनाच्या कामासंदर्भात सातारा राष्ट्रवादीच्या पक्षनिरीक्षक डॉ. अर्चना पाटील यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याकडे पत्रव्यवहार केला होता.
यावरून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी डॉ. अर्चना पाटील यांना धमकी दिली आहे. डॉ. पाटील यांनी चाकणकरांना लक्ष्य करीत धनगर समाजाचा द्वेष करतात, असा थेट आरोप त्यांच्यावर केला आहे. दरम्यान, वाफगाव किल्ला संवर्धनावरून हे प्रकरण राष्ट्रवादी महिला आघाडीत तापण्याचे संकेत मिळत आहेत.
वाफगाव येथे श्रीमंत यशवंतराव होळकर यांचे जन्मस्थान असलेला भुईकोट किल्ला आहे. यासंदर्भात डॉ. पाटील यांनी शरद पवार यांच्याकडे पत्रव्यवहार केला होता. यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांना हा विषय चांगलाच खटकला. चाकणकर यांनी पाटील यांना फोन करून राष्ट्रवादी पक्षाचे पद लावायचे नाही. तुमचा पक्षाशी काही संबंध नाही, अशी धमकी त्यांना दिली.
याबाबत डॉ. पाटील म्हणाल्या की, वाफगाव येथील किल्ल्याविषयी गांभीर्य न समजण्याइतपत त्या बेजबाबदार आहेत का. त्यांना पक्षाने आवर घातला पाहिजे, असा प्रश्न आम्हा पदाधिकाऱ्यांना पडला आहे. आम्ही पक्षाचे पदाधिकारी असलो तरी समाजाचे प्रश्न आम्हाला मांडावे लागतात. आम्ही समाजाचे प्रश्न मांडणारच, असे त्यांनी यावेळी निक्षून सांगितले. चाकणकर या रयत शिक्षण संस्थेच्या कौन्सिलवर आहेत. त्यांना धनगर समाजाविषयी एवढा द्वेष का, असा थेट आरोप डॉ. पाटील यांनी केला आहे.
राज्यातल्या सर्वच राजकीय पक्षांकडून जाणीवपूर्वक होळकरांच्या वास्तू दुर्लक्षित राहिल्या आहेत. त्यामुळे धनगर समाजामध्ये नाराजी आहे. रयत शिक्षण संस्थेची शाळा महाराजा यशवंतराव होळकर यांचे जन्मस्थान असलेल्या किल्ल्यामध्ये सुरू आहे. परंतु या किल्ल्याकडे राज्य सरकारचे कायम दुर्लक्ष झाले आहे. रयत शिक्षण संस्थेने हा किल्ला शिक्षणासाठी ताब्यात घेतला. मात्र, मूळ ऐतिहासिक वास्तूची जपणूक करण्याच्या अटीवर ही जागा संस्थेनी ताब्यात घेतली होती. साठ वर्षांपासून किल्ले व परिसराची पडझड झाली आहे. याविषयी चाकणकर का बोलत नाहीत, असा सवाल पाटील यांनी केला.