कर्नाल(हरियाणा) – सन 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी राहुल गांधी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून प्रोजेक्ट करण्यासाठी आम्ही भारत जोडो यात्रा काढण्यात आलेली नाही, या पदयात्रेचा निवडणुकांशीही काही संबंध नाहीं असे कॉंग्रेस सरचिटणीस जयराम रमेश यांनी म्हटले आहे. या यात्रेदरम्यान आर्थिक असमानता, सामाजिक ध्रुवीकरण आणि राजकीय हुकूमशाही या तीन मोठ्या मुद्द्यांवर प्रकाश टाकण्यात राहुल गांधी यशस्वी झाले आहेत असेही त्यांनी म्हटले आहे.
ते म्हणाले की ही एक वैचारिक यात्रा आहे आणि राहुल गांधी तिचा प्रमुख चेहरा आहेत. पण ही केवळ कोणाला तरी कोणत्या तरी पदासाठी प्रोजेक्ट करणे हा यातला हेतू नाही. रमेश म्हणाले की ही यात्रा “आरएसएस आणि भाजपचा वैचारिक मुकाबला करण्यासाठी आहे. त्यात राहुल गांधी हे भाजप सरकारच्या गैरकारभाराच्या संबंधात महत्वाचे विषय उपस्थित करीत असून त्याला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. ते दररोज त्यांच्या पदयात्रेतील संवादात, त्यांच्या बोलण्यातून, त्यांच्या कोपरा सभांमधून आर्थिक असमानता, सामाजिक ध्रुवीकरण आणि हुकुमशाहीची राजवट या अनुषंगाने मुद्दे मांडत आहेत. त्यामुळे त्यांच्या पंतप्रधानपदासाठी हा सारा प्रकार सुरू आहे काय हा प्रश्न विचारणे अयोग्य आहे, असे त्यांनी पत्रकारांना सांगितले.
रमेश म्हणाले की, भारत जोडो पदयात्रा कॉंग्रेसची विचारधारा, पक्ष संघटना मजबूत करणे यासाठी आहे. आणि त्याच बरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्यक्तिमत्त्व, त्यांची कार्यपद्धती, धोरणे, त्यांचे छळ आणि सूडाचे राजकारण यामुळे निर्माण होणाऱ्या आपत्ती आणि नुकसान याबद्दल देशाची विवेकबुद्धी जागृत करणे हा आमचा प्रमुख उद्देश आहे. त्यामुळे केवळ एक व्यक्ती किंवा केवळ निवडणूक या विषयापुरते या यात्रेला सीमीत करून त्याचे महत्व कमी करू नका अशी सुचनाहीं त्यांनी पत्रकारांना केली. दरम्यान पानिपतच्या शेजारून ही यात्रा शुक्रवारी कर्नाल जिल्ह्यात दाखल झाली, तिथे राहुल गांधींनी एका जाहीर सभेला संबोधित केले.