मुंबई – विरोधकांच्या इंडिया आघाडीकडे जनहिताचा कोणताही कार्यक्रम नाही. त्यांच्या नेत्यांवर जनतेचा विश्वास नाही, असे मत राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले आहे. येत्या 25 आणि 26 ऑगस्टला इंडिया आघाडीच्या नेत्यांची एक बैठक मुंबईत होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे विधान केले आहे.
ते म्हणाले की, ज्या समान कार्यक्रमावर ही आघाडी झाली आहे ती कधीच कोणापुढे आलेली नाही. त्यांच्याकडे कोणताही ठोस कार्यक्रम नाही, असे त्यांनी नमूद केले. इंडिया आघाडीच्या या बैठकीच्या आयोजनाची तयारी प्रामुख्याने उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
या बैठकीत आघाडीच्या 11 सदस्यांची समन्वय समिती निश्चित केली जाणार असून, जागावाटपाच्या संबंधातील ढोबळ धोरणही निश्चित केले जाणार आहे. इंडिया आघाडीची ही तिसरी बैठक असेल. या आधीच्या दोन बैठका पाटणा आणि बंगळुरू येथे झाल्या आहेत.