पुणे – करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शहरात शुक्रवारी सायंकाळनंतर वीकेंड लॉकडाऊन लागू झाला. त्यानंतर पहिल्या दिवशी शनिवारी नागरिकांनी घरात राहण्यास प्राधान्य दिले. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी व रुग्णालयात जाणाऱ्यांव्यतिरीक्त इतर कोणीही रस्त्यावर दिसत नव्हते. पोलिसांनी ठिकठिकाणी नाकेबंदी करुन बाहेर पडणाऱ्यांची चौकशी केली. त्यामुळे गेल्या वर्षीच्या लॉकडाऊनच्या कटू आठवणी ताज्या झाल्या.
शुक्रवारी सायंकाळपासून शहरात संचारबंदी सुरू झाली. शनिवारी सकाळी उपनगरांत तसेच मध्यवर्ती भागांत काही नागरिक दूध खरेदीसाठी बाहेर पडले होते. निवासी तसेच वस्ती परिसरात थोडीशी वर्दळ होती. दुपारनंतर नागरिक पाय मोकळे करण्यासाठी घराबाहेर पडले. मात्र, ही संख्याही तुरळक होती.
कॅब सेवेला परवानगी असल्याने स्वारगेट, शिवाजीनगर, कोथरुड आदी भागात थोडीफार वाहतूक दिसत होती. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनी ओळखपत्र बाळगल्याने पोलिसांनी त्यांच्याशी वाद घातला नाही. मात्र, मेडिकल व डॉक्टरकडे जाण्याचे कारण सांगून काही नागरिक बाहेर पडले होते. त्यांची मात्र कडक पडताळणी होत होती.
“महापालिका क्षेत्रासाठी अधिकाऱ्यांनी निर्णय घेतले, त्यानुसार सर्व आस्थापना बंद आहेत. फक्त मेडिकल व सकाळच्या वेळेस दूध विक्री सुरू होती. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच परवानगी आहे. त्याप्रमाणे बंदोबस्त लावला. मागील आठवडाभर सायंकाळीची संचारबंदी आहे, त्याचाही चांगला फायदा झाला. शहरात 96 ठिकाणी तपासणी नाके आहेत. प्रत्येक वाहनचालकाची चौकशी केली जात आहे.
नागरिकांना त्रास देण्याचा यामागे उद्देश नाही. काही नागरिक निर्बंधांना विरोध करतात, मात्र ही विरोधाची वेळ नाही. आता कडक निर्बंध पाळले नाही, तर परिस्थिती हाताबाहेर जाईल. पुणे शहरात 12 पोलीस कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू व 750 जणे बाधित झाले. मात्र, तरीही पोलीस त्याच जोमाने काम करत आहेत. बाहेर पडलेले नागरिक वैध कारणासाठीच बाहेर पडले होते. विनाकारण बाहेर पडणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.”
– डॉ. रवींद्र शिसवे, सह पोलीस आयुक्त