पुणे – एमएसआरडीसीने हाती घेतलेल्या रिंगरोडचे काम गतीने पूर्ण करण्यासाठीच्या पूर्वतयारीला वेग आला आहे. समृध्दी महामार्गाप्रमाणेच या रिंगरोडचे भूसंपादन लवकर पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालय येथे अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. यामध्ये प्रामुख्याने जमिनीचे मूल्याकंनाबाबत एकसूत्रता आणणे, मूल्याकंन करताना कायद्यातील तरतूदींचे पालन आणि समृध्दी महामार्गाचे भूसंपादन करताना अवलंबलेली कार्यपध्दती याविषयावर चर्चा करण्यात आली.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, प्रांताधिकारी यांच्यासह समृध्दी महामार्गाचे भूसंपादन प्रक्रिया राबविण्यात आलेले अधिकारी उपस्थित होते. यावेळी समृध्दी महामार्गाचे भूसंपादन करताना आलेले अनुभवानाचे कथन या अधिकाऱ्यांनी केले. तसेच भूसंपादनासाठी करण्यात येणाऱ्या मूल्याकंनाबाबत जिरायत, बागायती जमिनी, शेतातील झाडे, विहीर आणि घरांचा विचार करून अचूक मूल्यांकन करावे. यात कोणावरही अन्याय होणार नाही याकडे लक्ष द्यावे, अशा सूचना देण्यात आल्या.
या रिंगरोडचे पूर्व व पश्चिम असे दोन टप्पे आहेत. पूर्व रिंगरोड उर्से (ता. मावळ)- केळवडे (ता.भोर ) असा आहे. पूर्व रिंगरोड हा मावळ, खेड, हवेली, पुरंदर आणि भोर या तालुक्यातून जाणार आहे. तर पश्चिम रिंगरोडला केळवडे पासून सुरुवात होणार असून हवेली, मुळशी आणि मावळ येथील उर्से टोलनाका येथे एकत्र येणार आहे. रिंगरोडच्या भूसंपादनासाठी राज्य सरकारकडून पुरवणी अंदाजपत्रकात एक हजार कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे भूसंपादनाच्या कामकाजास गती आहे.