पुणे -महापालिका हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या 2017 मधील 11 गावे आणि 2021 मधील 23 गावांना प्रभाग रचनेत मोठा फटका बसला आहे. या गावांसाठी महापालिकेच्या नवीन प्रभाग रचनेत अवघे 11 प्रभाग वाट्याला आले आहेत. त्यामुळे या गावांमधील अनेकांना आपल्या इच्छांना मुरड घालावी लागणार असून विद्यमान नगरसेवकांसाठी जागा सोडाव्या लागणार आहेत. किंवा “अपक्ष’ म्हणूनच लढावी लागणार आहेत. यापूर्वी 11 गावे पालिकेत समाविष्ट झाल्यानंतर त्यांच्यासाठी 2 नगरसेवक होते. मात्र, आता ही संख्या 33च्या आसपास असणार असली तरी त्याच वेळी विद्यमान 20 ते 22 नगरसेवकांनाही याच गावांचा पर्याय असल्याने अनेक इच्छुकांना “अपक्ष’ म्हणून पालिकेच्या मैदानात उतरावे लागणार आहे.
जनगणना न झाल्याचा फटका…
गावे महापालिकेत आली असली, तरी 2011च्या जनगणनेनुसारच या गावांची लोकसंख्या गृहीत धरण्यात आली आहे. त्यामुळे ही गावे लोकसंख्येनुसार जोडण्यात आली. या 34 गावांची लोकसंख्या सुमारे सव्वापाच लाख गृहीत धरण्यात आली आहे, तर प्रभाग रचना करताना महापालिकेच्या जुन्या हद्दीचा काही भाग या गावांमध्ये समाविष्ट करून नवीन प्रभाग करण्यात आले आहेत. परिणामी, शहराच्या मध्यवर्ती भागापेक्षा या गावांमधील प्रभाग रचनेने मोठे झाले आहेत. त्यामुळे अनेकांना मतदारांपर्यंत नव्याने पोहोचण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागणार आहे.