पुणे –भारतीय जनता पक्षाची पुणे शहरातील संघटनात्मक बांधणी, गेल्या पाच वर्षांत महापालिकेच्या माध्यमातून केलेला नियोजनबद्ध विकास, पुणेकरांचा दृढ विश्वास आणि सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरलेल्या राज्यातील महविकास आघाडी सरकारवरील जनतेचा रोष, यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत भाजपच्या 100 पेक्षा अधिक जागा निवडून येतील, असा विश्वास शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी ठामपणे व्यक्त केला. महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा प्रसिद्ध झाल्यावर मुळीक यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
शहराध्यक्ष मुळीक म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारमध्ये अंतर्गत कलह असल्याने आराखडा प्रसिद्ध होण्यास विलंब झाला. आराखडा तयार करताना त्यांच्यात एकवाक्यता नव्हती. प्रभागांची तोडफोड करून नवीन रचना करण्यात आली. आत्मविश्वास गमावलेल्या महाविकास आघाडीवर भाजप सहज विजय संपादन करू शकेल, असा विश्वास वाटतो.
मेट्रो, समान पाणीपुरवठा, भामा आसखेड प्रकल्प, पीएमपीच्या ताब्यात मोठ्या प्रमाणात बसेसची खरेदी, नदी शुद्धीकरण योजनेला गती, अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय, करोना काळात आरोग्य यंत्रणा सक्षम, नगरसेवकांनी केलेली विकासकामे या जोरावर आम्ही पुन्हा एकदा पुणेकरांच्या विश्वासाला पात्र ठरू, असे मुळीक यांनी स्पष्ट केले.