नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची राजधानी दिल्लीच्या राजकारणात 2014 मध्ये एन्ट्री झाली. त्यांची एन्ट्रीच एवढी धमाकेदार होती की त्यांनी केंद्रातील आघाडी सरकारांचे युग संपवले आणि स्वबळावर सत्ता स्थापन केली. नंतर एका पाठोपाठ एक राज्येही काबिज केली व 2019 मध्ये पुन्हा केंद्रात आपली स्थिती घट्ट केली. कॉंग्रेस पक्ष दुबळा झाला आणि अन्य विरोधी पक्षही थिजल्यासारखी स्थिती गेल्या काही वर्षांत पाहायला मिळाली. मात्र आता महागाई, बेरोजगारी आणि अन्य काही कारणांमुळे विरोधक एकवटताना दिसत आहेत. तसेच मोदी आणि शहांची घोडदौड 2024 मध्येही अशीच सुरू राहणार का, या प्रश्नाला पर्याय देऊ शकण्याची क्षमता असणारी स्थितीही निर्माण होताना दिसते आहे. यांना पर्याय म्हणजे सध्या चार नावे वेगाने पुढे येत आहेत.
नितीश- लालू यादव:
बिहारमध्ये नितीश यांनी भाजपला बाहेरचा रस्ता दाखवला आहे व पुन्हा आपल्या जुन्या मित्राशी अर्थात लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाशी हातमिळवणी केली आहे. कॉंग्रेस आणि अन्य छोटे पक्ष त्यांच्या समवेत आहेत. त्यामुळे आजच्या स्थितीनुसार बिहारचा विचार केला तर लोकसभेतील महागठबंधनचे संख्याबळ 19 होते. भाजपचे राज्यातून केवळ 17 खासदार आहेत. मतांची टक्केवारी विचारात घेतली तर भाजपकडे 23.58 टक्के मते आहेत. जे महागठबंधनच्या 44.87 टक्क्यांच्या निम्म्यापेक्षाही कमी आहेत. लोकजनशक्तीची 8 टक्के मते भाजपसोबत असली तरी त्यांचीही दोन भागांत म्हणजे काका- पुतण्यात वाटणी झाली आहे. हाच ट्रेंड कायम राहीला तर 2024 च्या लोकसभा निवडणुकीत बिहारमध्ये भाजपला जबर फटका बसू शकतो.
ममता बॅनर्जी:
भाजपसमोर दुसरे मोठे आव्हान आहे ते प. बंगालमधील तृणमूल कॉंग्रेसचे. विधानसभा निवडणुकीत या पक्षाने एकहाती भाजपला पराभूत केले आहे व तिसऱ्यांदा सत्ता मिळवली आहे. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत ममतांच्या पक्षाला 48 टक्के मते मिळाली. संपूर्ण ताकद पणाला लावूनही या निवडणुकीत भाजपला 27.81 टक्के मते मिळाली. 2019 च्या लोकसभा निवडणुकीतही मोदी लाटेत तृणमूलला 43 टक्के तर भाजपला 40 टक्के मते मिळाली होती. कॉंग्रेसला 5 तर डाव्यांना 6 टक्के मते मिळाली होती. लोकसभेत सर्व विरोधक एकवटले तर या राज्यात सध्या भाजपकडे असलेल्या 18 जागा कमी होऊ शकतात.
एम. के. स्टॅलीन:
तमिळनाडूत द्रमुकचे एम. के. स्टॅलीन यांनी मुख्यमंत्री म्हणून आपला प्रभाव निर्माण केला आहे. जयललिता यांचे निधन आणि सुपरस्टार रजनीकांत यांचा राजकारणात येण्यास अनुत्साह यामुळे स्टॅलीन यांची स्थिती मजबुत आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत या राज्यात द्रमुक- कॉंग्रेस युतीला 39 पैकी 38 जागा मिळाल्या होत्या. त्यांना 33 टक्के मते मिळाली होती. तर भाजप आणि जयललिता यांचा द्रमुक यांच्या मतांची टक्केवारी होती 19 टक्के.
शरद पवार- उध्दव ठाकरे:
महाराष्ट्रात राष्ट्रवादी- शिवसेना- कॉंग्रेस महाविकास आघाडीचे सरकार जरी पायउतार झाले असले आणि सध्या मोठी फुट पडल्यामुळे शिवसेनेची अवस्था बिकट झाली असली तरी शिवसेना ही विचारांच्या आधारावर उभी राहीलेली संघटना ग्रामीण भागापर्यंत पोहोचली आहे. राष्ट्रवादीही शहरांच्या तुलनेत व विशेषत: प. महाराष्ट्रात प्रबळ पक्ष आहे. 2024 ची निवडणूक हे तिन्ही पक्ष एकत्र लढू शकतात. राज्यातील 48 जागांपैकी 23 जागांवर भाजपला 2019 मध्ये विजय मिळाला होता. शिवसेनेला 18 जागा मिळाल्या होत्या. दोन्ही पक्षांना अनुक्रमे 28 आणि 24 टक्के मते मिळाली होती. तर वेगवेगळे लढलेल्या कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला अनुक्रमे 16 आणि 15.66 टक्के मते मिळाली होती. शिवसेनेतील फुटीमुळे त्या पक्षाची ताकद जरी विभागली गेली असली तरी महाविकास आघाडीतील तिनही पक्ष एकत्र राहीले तर त्यांची मतांची टक्केवारी भाजपपेक्षा बरीच जास्त असेल.