नवी दिल्ली – शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र सरकार बांधील आहे आणि नव्याने केलेल्या तीन कायद्यांमुळे शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारणार आहे, याचाच पुनरूच्चार पंतप्रदान नरेंद्र मोदी यांनी केला. त्याचवेळी आंदोलक शेतकऱ्यांपुडे माथा टेकवायला तयार आहे. त्यांना जे म्हणायचे आहे ते ऐकून घ्यायला आमची तयारी आहे, शेतकऱ्यांचे हीत हाच आमचा प्रधान्यक्रम आहे, असे ते म्हणाले.
मध्य प्रदेशात शेतकऱ्यांच्या मेळाव्यात मोदी बोलत होते. ते म्हणाले, शेतकऱ्यांच्या कल्याणाला आमच्या सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे. नव्या कृषी कायद्याविषयी पसरवल्या जाणाऱ्या अफवांवर त्यांनी विश्वास ठेवू नये. विरोधक या कायद्यांबाबत अफवा पसरवत आहेत. शेतकऱ्यांसाठी आम्ही केलेले काम आणि मागील सरकारने केलेले काम याची तुलना करा, असे आवाहनही त्यामनी केले.
अन्य देश नव्या तंत्रज्ञानाकडे वळत असताना शेतकऱ्यांना त्यात मागे ठेवून चालणार नाही. सध्या कृषी कायद्यांबाबत खूप चर्चा सुरू आहे. ती फार दीर्घ काळापासून चालत आली आहे. आमच्या शेतकऱ्यांची या कायद्याची अनेक दशकांपासून मागणी होती. जर पक्षांचे जाहीरनामे काढून पाहिले तर त्यात ही आश्वासने कायम दिसतील, असे त्यांनी सांगितले.
राजकीय फायद्यासाठी राजकीय पक्ष शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहेत. शेती सुधारणांबाबत त्यांना काही अडचण नाही. त्यांची समस्या ही आहे की, त्यांनी जे आश्वासन दिले होते ते मोदींनी पूर्ण केले. मी राजकीय पक्षांना विनंती करतो, या कायद्यांचे श्रेय तुम्हाला हवे असेल तर तुम्ही घ्या. मी याचे श्रेय राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्याला देतो.
ज्यावेळी ते सत्तेत होते त्यांनी स्वामीनाथन आयोगाची स्थापना केली. आम्ही तो अहवाल शोधला आणि त्यातील शिफारसींची अंमलबजावणी केली. मध्य प्रदेशच्या शेतकऱ्यांना कॉंग्रेसच्या खोट्या आश्वासनांचा अनुभव आहे. त्यांनी कर्जमाफी केल्याची घोषणा केली, तुमची कर्जमाफी झाली का? असे त्यांनी विचारले.