नाशिक – राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार यांच्यात गुपचूप बैठका होत असल्या तरीही स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांमध्ये गट तयार झाले आहेत. नाशिकमध्ये राष्ट्रवादी भवन ताब्यात घेण्यावरून राडा झाला होता. येथील राष्ट्रवादी भवनाचा ताबा अजित पवार आणि छगन भुजबळ समर्थकांनी घेतला आणि शरद पवार गटाला कार्यालयात प्रवेश नाकारला. त्यानंतर शरद पवार गटानेही मुंबई नाका येथेच एका रात्रीत दुसरे कार्यालय उभारले आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे गटात ज्याप्रमाणे प्रकरणे सुरू होती. तसीच परिस्थीती राष्ट्रवादीत सुरू आहे. मात्र येथे शिवसेनेप्रमाणे टोकाचा विरोध दिसून येत नाही. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाबाबत जनतेमध्ये संभ्रम दिसून येत आहे. अनेकांना वाटतेय की बाहेरून जरी राष्ट्रवादीत फूट पडल्याचे दिसत असले तरी आतून ते एकच आहेत.
राष्ट्रवादी पक्षाचे अधिकृत असलेले तीन मजले हायटेक कार्यालय मिळत नसल्याचे बघून 100 मीटर अंतरावर असलेल्या एका भूखंडावर तंबू ठोकत शरद पवार गटाने नवीन कार्यालयाचा डेरा उभारला आहे.
दरम्यान, अजित पवार महायुती सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर महाराष्ट्रासह नाशिकमध्ये राष्ट्रवादीच्या फुटीवरून जोरदार कलगीतुरा रंगला होता. त्यातच शरद पवार येवला सभा दौऱ्यावर असताना नाशिकमध्ये राष्ट्रवादी कार्यालयावरून राडा झाला होता. त्यानंतर मुंबईनाका परिसरामध्ये असलेल्या कार्यालयाचा ताबा अजित पवार गटाकडे गेला. दोन्ही गट आमने-सामने आले होते. यावेळी मोठा तणाव निर्माण झाला होता. तगडा पोलीस बंदोबस्त असल्यामुळे अनर्थ टळला होता. भुजबळ गटाने राष्ट्रवादी भवनाचा ताबा घेतल्यापासून या कार्यालयात शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना प्रवेश दिला जात नसल्याने पक्ष पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बैठका खासगी ठिकाणीच होत होत्या. आता शरद पवार गटाने आगामी निवडणुका लक्षात घेत पक्ष विस्तार आणि कार्यकर्त्यांसोबत संवाद साधण्यासाठी नवीन कार्यालयाचा तंबू ठोकला आहे.
पक्षाचे जुने कार्यालय हे राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या नावे असून पोलिसांच्या मदतीने अजित पवार यांचे समर्थक तेथे काम करत आहेत. त्यांच्याकडे सर्व मॅनेज पदाधिकारी तर आमच्याकडे निष्ठावंत शरद पवार समर्थक आहेत. तंबूत कार्यालय बनवूनदेखील पक्षाचा विस्तार करू, असा विश्वास शहराध्यक्ष गजानन शेलार यांनी व्यक्त केला आहे.