कोहिमा – सध्या ईशान्येत निवडणुकीचे वारे वाहत आहेत. येत्या 27 तारखेला नागालॅंड आणि मेघालय या दोन राज्यांमध्ये मतदान होणार आहे. त्यासाठी भाजप प्रचारात व्यस्त आहे. भाजपचे बडे नेतेच नव्हे तर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदीही तेथे सभा घेत आहेत.
दरम्यान, शुक्रवारी नागालॅंडमध्ये निवडणूक रॅलीला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी नागालॅंड भाजप अध्यक्ष तेमजेन इमना अलंग यांचे कौतुक केले. यानंतर सोशल मीडियावर आपल्या वेगळ्या स्टाईलसाठी ओळखल्या जाणाऱ्या इम्ना अलंगने पंतप्रधानांना काहीतरी सांगितले, ज्यावरून ते पुन्हा चर्चेत आले आहे.
नागालॅंडमधील जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप प्रदेशाध्यक्षांचे कौतुक केले. ते म्हणाले की, ‘तुमचे नेते तेमजेन इम्ना यांनी सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. संपूर्ण देश त्यांचे ऐकतो. डिजिटल प्लॅटफॉर्मवर ते नागालॅंड आणि ईशान्येकडील लोकांबद्दल उत्कृष्टपणे बोलत आहेत.
मी त्यांना सोशल मीडियावरही पाहतो. मंचावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून कौतुक ऐकून तेमजेन यांनाही खूप आनंद झाला. त्यांनी ट्विटरवर पंतप्रधान मोदींचा व्हिडिओ शेअर करून कृतज्ञता व्यक्त केली आहे. व्हिडिओसोबत त्यानी लिहिलेल्या कॅप्शनची सध्या सगळीकडे चर्चा होत आहे. तेमजेन यांनी लिहिले, ‘गुरुजी बोलले! आम्ही धन्य झालो!’
याआधी तेमजेन यांनी लोकसंख्या नियंत्रणाबाबत केलेली वक्तव्ये गाजली होती. खरे तर जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त त्यांनी ट्विट करून लोकसंख्या नियंत्रणाचा पर्याय सुचवला होता. ते म्हणाले होते की, ‘लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यांबाबत आपण समजूतदार होऊ या आणि मर्यादित अपत्यांचा विचार करू या.
माझ्यासारखे अविवाहित राहून आपण लोकसंख्या नियंत्रणासाठी कायमस्वरूपी उपाय देऊ शकतो. अविवाहित राहण्यासाठी आमच्या चळवळीत या. विशेष म्हणजे नागालॅंडमध्ये 60 सदस्यीय विधानसभेच्या जागांसाठी 27 फेब्रुवारीला निवडणूक होणार आहे. सध्या राज्यात भाजप-एनडीपीपी युतीचे सरकार आहे.