भोपाळ – मध्य प्रदेशातील रीवा आणि सतना जिल्ह्यांच्या सीमेवर शुक्रवारी रात्री उशीरा एका ट्रकने रस्त्याच्या कडेला थांबलेल्या तीन बसेसना धडक दिल्याने 14 जण ठार आणि 60 जण जखमी झाले. शुक्रवारी रात्री बरखडा गावाजवळील बोगद्याच्या बाहेर हा अपघात झाला असून बसमधील प्रवासी सतना शहरातील ‘कोल महाकुंभ’ मधून परतत होते, असा दावा प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. शबरी माता जयंतीनिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या कार्यक्रमाला संबोधित केले होते.
अतिरिक्त मुख्य गृहसचिव डॉ. राजेश राजोरा यांनी सांगितले की, या अपघातात 14 लोक ठार झाले असून मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. अपघातात किमान 60 जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे.
प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, ट्रकने बसेसना मागून धडक दिली आणि त्यातील एक पलटी होऊन खड्ड्यात पडली. महाकुंभातून परतणाऱ्या प्रवाशांना जेवणाची पाकिटे देता यावीत म्हणून बस थांबवण्यात आल्या होत्या. जिल्हा दंडाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांसह सिधी आणि रीवा जिल्ह्याचे उच्च अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. दोन्ही बसमधील सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यात आले आहे.